Monday 23 May 2016

निष्णात राजकारणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सर्वसामान्य घरातील राजकीय चेहरा अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा हा पोरगा फार नशिबवान आहे, असे सहज म्हटले जायचे. कारण फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे इतरांनाच काय तर त्यांनाही कधी स्वप्नात वाटले नसावे. पण त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर त्यांना अनेक राजकीय संकटांना तोंड द्यावे लागले. कारण विरोधी पक्षांत शरद पवार यांच्या सारखे मुरब्बी राजकारणी तर स्वतःच्या पक्षातही नितीन गडकरी यांच्यासारखा मातब्बर नेता विरोधात होता. इतरांचा त्रास होता तो वेगळाच. पण या सर्व आव्हानांवर मात करत फडणवीस यांनी स्वतःला सिद्ध करुन दाखवले. सध्या नाथाभाऊंवर कोसळलेला संकटांचा डोंगर बघितला तर पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. कारण संशयाची सुई त्यांच्या दिशेला असल्याचे खासगीत बोलले जात आहे. या निमित्ताने फडणवीस नशिबवान आहेत, की निष्णात राजकारणी अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण या प्रकरणी त्यांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नितीन गडकरी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी नितीन गडकरी यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती. गडकरी महाराष्ट्रातील मातब्बर नेते असल्याने आणि केंद्रात चांगले वजन असल्याने या पदी त्यांची वर्णी लागेल असे वाटत होते. शिवाय फडणवीस आणि पंकजा यांच्यात कुणाला मुख्यमंत्री करावे असे विचारमंथन सुरु असल्याने त्याचा लाभ गडकरी यांना मिळेल असे वाटले होते. पण फडणवीस यांचे पारडे जड झाले. यावेळी गडकरी यांचा पत्ता कुणी कट केला, याचा खुलासा अजूनही झालेला नाही. पण याचे फळ मात्र फडणवीस यांना चाखायला मिळाले.

पंकजा मुंडे
गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पंकजा यांनी संघर्ष यात्रा आयोजित करुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्याची नोंद भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला घ्यावी लागली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर अप्रत्यक्षपणे सांगून टाकले होते, की पंकजाच मुख्यमंत्री असतील. शिवाय पंकजांच्या यात्रेत ते सहभागीही झाले होते. पण पंकजा यांची या पदी काही वर्णी लागली नाही. शिवाय चिक्की स्कॅम सारख्या विषयांनी राजकीय कारकिर्द धोक्यात आली. धनंजय मुंडे असो वा सेल्फी विषय पंकजा राजकारणात मागे पडल्या. त्याचा फायदा फडणवीस यांना झाला.

विनोद तावडे
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे कायम वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर विनोद तावडे एक मराठा नेता म्हणून समोर आले. फडणवीस यांच्यासमोर तावडे नावाचे मोठे आव्हान नसले तरी भविष्यात वाढून ठेवलेले संकट होते. तावडे यांना झुकवण्यात आणि आपल्या मुठीत ठेवण्यात फडणवीस यांना यश आले आहे. तावडे यांनीही समंजस भूमिका घेऊन फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले आहे. यातच मुख्यमंत्र्यांचे राजकीय कसब दिसून येते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाला तेव्हा मोठा वाद उफाळून आला होता. तेव्हा तावडे यांचा पाठिंबा मिळवण्यात फडणवीस यशस्वी झाले होते.

एकनाथ खडसे
नाथाभाऊ हे फडणवीस यांच्या तोलामोलाचे महाराष्ट्रातील राजकीय नेते. प्रदिर्घ अनुभवाच्या बळावर त्यांनी केंद्रीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध जपले आहेत. त्याचा फायदा फडणवीस यांच्यावर दबाव तयार करण्यात झाला आहे. पण अचानक काय झाले कुणास ठाऊक त्यांचा तोतया पीए सापडतो काय, त्यानंतर दाऊदशी नाव जोडले जाते काय, आता एमआयडीसी घोटाळा या प्रकरणी नाव येते काय... जणू काही त्यांच्यावर संकटांचा पर्वत कोसळलाय. आता तर त्यांना भाजपमधील छगन भुजबळ म्हटले जात आहे. पण याचा फायदा झाला तो फडणवीस यांनाच. कारण खडसे यांचे राजकीय महत्त्व कमी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा हा मुद्दा समोर आला तर फडणवीस यांचेच नाव घेतले जाऊ शकते.

भाजपमधील इतर नेते
सरकार चालवत असताना भाजपमधील इतर नेत्यांचा उपद्रव कमी करण्यात फडणवीस यांना यश आले आहे. त्यामुळे एक स्थिर आणि शाश्वत सरकार फडणवीस देऊ शकले. त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांना मोठे केले. पण प्रमाणाच्या पलिकडे या नेत्यांना प्रसिद्धी मिळणार नाही किंवा ते डोईजड होणार नाहीत याकडे लक्ष ठेवले. त्याचा राजकीय फायदा झाला.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे पवारांसारखा मुरलेला राजकारणी आणि अनेक वर्षांपासूनचा गाढ अनुभव होता. तरीही विरोधी पक्ष म्हणून दोनही पक्ष आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ असो, फसलेला मेक इन महाराष्ट्र असो, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा असो असा कोणताही विषय विरोधी पक्षांना कॅपिटलाइज करता आला नाही. याचा अप्रत्यक्ष फायदा फडणवीस सरकारला झाला.

नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा हुकमी एक्का आहेत. त्यांच्या सारख्या प्रभावशाली नेत्यामुळेच भाजपला लोकसभेत आणि ओघाओघाने विधानसभेत यश मिळाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचा प्रचंड प्रभाव असणे ओघाओघाने आलेच. तरीही त्यांच्या छत्रछायेत कोणतीही संकटे न येता सरकार सांभाळण्यात फडणवीस यशस्वी झाले आहेत. कारण हे दिसते तेवढे सोपे काम नाही.

शरद पवार
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे शरद पवार आणि पवार म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण असे आतापर्यंत सूत्र राहिले आहे. असा मुरब्बी नेता विरोधी पक्षात असताना सरकार चालवणे म्हणजे एक दिव्यच. पण फडणवीस यांनी यावर मात केली. आपल्या पदाचा बडेजाव न मिरवता पवार यांच्याशी जुळवून घेतले. पवार आणि मोदी यांच्यातील मैत्रिचा आपला शड्डू आणखी मजबूत करण्यासाठी उपयोग करुन घेतला. पवारांचा राज्याच्या राजकारणातील राजकीय हस्तक्षेप मर्यादित ठेवण्यात फडणवीस यशस्वी झाले.

उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झोप उडवली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले तेव्हा शिवसेनेला मंत्रिमंडळात मोक्याच्या जागा देण्यात आल्या नाहीत. शिवाय मंत्रिमंडळाच्या निर्णयात शिवसेनेचा वाटा अगदी नगण्य असतो असेही बोलले जाते. मुंबईतील निवडणुकांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना स्थानिक राजकारणात गुंतवण्यात फडणवीस यशस्वी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विस्तार खुंटला आहे. लोकसभेत आणि विधानसभेत घवघवीत यश मिळूनही शिवसेना केवळ मुंबई आणि औरंगाबाद या शहरांमध्ये अडकून पडली आहे.