Tuesday 24 November 2020

पुणे जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला

 पुणे जिल्हा सरपंचपदाची आरक्षण सोडत 8 डिसेंबरला 

कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे तब्बल दहा महिने लांबणीवर पडलेली जिल्ह्यातील १४००  ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची पुढील पाच वर्षासाठीची आरक्षण सोडत येत्या ८ डिसेंबर रोजी काढली जाणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयामार्फत या आरक्षण सोडतीचे नियोजन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवार (दि. २४) रोजी आरक्षण सोडतीत घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील तब्बल ७४९ ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जानेवारीत या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यापूर्वी दर पाच वर्षांत एकदा सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर केली जाते. यंदा मार्च- एप्रिल महिन्यातच ही सोडत जाहीर होणार होती. परंतू कोरोनाच्या संकटामुळे ही सोडत लांबणीवर पडली होती. जिल्ह्यामध्ये १४०८ ग्रामपंचायती असून,  त्यातील चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढली जाईल. आठ ग्रामपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून अद्याप आरक्षणाबद्दल चे कोणतेही आदेश नसल्याने या आठ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत काढली जाणार नाही.आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण गटासाठी ७५६ ग्रामपंचायती सरपंचपदे उपलब्ध आहेत त्यातील ३८३ सरपंच मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी तर ३७३ सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३४७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहेत त्यातील १७७ महिलांसाठी तर १७० नामाप्रसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी ५८ सरपंचपद आरक्षित आहेत त्यातील ते ३० महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जातीसाठी १२५ सरपंच पदांपैकी ६६ पदे महिलांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित क्षेत्रांमधील ११४ ग्रामपंचायती असून त्यामधील 58 सरपंच पदेही महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाच्यावतीने आरक्षण सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून तालुकास्तरावर ८ डिसेंबरला सरपंचपदाच्या आरक्षित आरक्षण सोडती काढल्या जाणार आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 

शिवसेना नेते आ. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई; विरोधकांचा हल्लाबोल

ईडीच्या कारवाईने राज्याच्या राजकारणात खळबळ

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. त्यांच्या 10 पेक्षा जास्त ठिकाणांवर ईडीने कारवाई सुरू केली. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवास्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकली. आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग आणि पुर्वेश यांच्या घरी आणि प्रताप सरनाईक यांच्या व्यावसायिक कार्यालयावरही ईडीने धाड टाकली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव युवासेना सचिव पूर्वे़श सरनाईक हे भाजपचे आमदार आणि गृहराज्य मंत्री रणजित पाटिल यांचे जावई आहेत तर सरनाईक यांचे दुसरे चिरंजीव विहंग सरनाईक यांनी दक्षिण मुंबईतील पारसी समाजातील असलेल्या अनाहिता पगडीवाला यांच्याशी विवाहबद्ध झालेले आहेत. त्यांचा विवाह उभयतांचा समान (कॉमन) मित्राच्या ओळखीतील संबंधातून ठरलेला आहे. दरम्यान सेनाप्रमुख ठाकरे यांच्या घराण्याशी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटचा संबध असल्याने ही कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी विधानसभा निवडणुक- 2019 मध्ये जाहीर केलेली संपत्ती 143 कोटी 97 लाख 18 हजार 745 आहे तर विधानसभा निवडणुक- 2014 मध्ये जाहीर केलेली संपत्ती 25 कोटी 08 लाख 53 हजार 190 इतकी होती. त्यांच्या संपत्तीत 5 वर्षात 474 टक्के (118 कोटी 88 लाख 65 हजार 555 इतकी) भरघोस वाढ झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान आ.प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक गेले त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाले आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचे स्वागत केले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून केली होती राजकारणाला सुरुवात

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात केली होती. रिक्षाचालक ते सक्रिय राजकारणी असा त्यांचा जीवनप्रवास आहे. विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत. यासोबतच घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी आहे. यामध्ये स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा विविध सोयी आहेत. प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्ध्यामध्ये झाला. ते 65 वर्षांचे आहेत. लहानपणीच ते वर्ध्यामधून मुंबईत स्थाइक झाले. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबवली पूर्वेतील एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतले.शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरनाईकांनी काही काळ रिक्षाही चालवली. यानंतर त्यांनी 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्तव घेत सक्रीय राजकारणात उडी घेतली. 1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. 2008 मध्ये सरनाईकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले. प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदार आहेत. प्रताप सरनाईकांना दोन मुलं आहेत. यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग तर धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे जवळचे संबंधत आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. तर युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. तर पूर्वेश यांच्या पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. 

राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक- खासदार शरद पवार

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,' अशी टीका खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत; खासदार नारायण राणेंची टीका

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली आहे. भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील टीकेचा बाण सोडला.“प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत,” असे म्हणत “यावर मी काही सांगणार नाही. कायदेशीर गोष्टींवर आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. न्यायालयाने दिलेले निर्णय, ईडी, सीबीआय यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत. माध्यमांनी आधी त्यांची माहिती घ्यावी, ईडीचा छापा योग्य अयोग्य हे सांगावे मग आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे नारायण राणे म्हणाले. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल मला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ आहे. बिल्डिंग किंवा बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे जिल्ह्यात आणि शहरात चालतात. ठाण्यातील शिवसेनेच सर्व नेते ज्या प्रकारचा कारभार करतात, त्यावरून ठाण्यात भ्रष्टाचार उघड आहे हे ठाणेकरांनाही माहिती आहे. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत', असा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु- खासदार संजय राऊत

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 'ईडीने भाजपा कार्यालयात शाखा उघडली असावी. पण आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,' असे जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे. 'काही झाले तरी आमचे हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचे सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,' असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 'प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये' अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?- काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत

सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर झालेल्या कारवाईवर काँग्रेसने भूमिका मांडत 'गेल्या सहा वर्षात एकातरी भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?,' असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 'विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपा असे घाणेरडे डाव खेळत आहे. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या ६ वर्षात भाजपा नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपावाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?', असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत. सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपाचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजपा जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपामध्ये घेतले', असे म्हणत सावंत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष सुरळीत चालणार!- मंत्री छगन भुजबळ

महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली की,' सेना नेते आमदार प्रताप सरनाईक हे अतिशय चांगले काम करत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. पण असे विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे नेते कदाचित काहींच्या डोळ्यात खुपताना दिसत आहेत, म्हणून हा राजकीय सूडाचा प्रकार घडतोय. ईडी हे केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं झाल्याचे दिसतंय. पण कोणतंही आणि कितीही दडपण आणले गेले तरीही एक लक्षात ठेवा, हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष आणि त्यापुढेही सुरळीत चालणार! असे ते म्हणाले.

चूक नसेल तर घाबरण्याचे कारण नाही – विरोधीपक्ष नेते फडणवीस

'ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल,' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 

Friday 20 November 2020

विधानपरिषदेतील राज्यपाल नामनियुक्त सदस्य निवड- मंत्रिमंडळ शिफारसीमधील राजकीय पार्श्वभूमीच्या आठ नावांना याचिकेद्वारे आक्षेप

नियुक्त्या करण्यास राज्यपालांना मज्जाव करण्याची न्यायालयात विनंती

विधानपरिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून आमदार करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने ज्या १२ नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे, त्यापैकी एकनाथ खडसे व राजू शेट्टी यांच्यासह आठ जण हे निव्वळ राजकीय पार्श्वभूमीचे आहेत. कला, साहित्य, विज्ञान, सहकार चळवळ किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख व योगदान नाही. केवळ राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्या नावांची शिफारस केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या करण्यास राज्यपालांना मज्जाव करावा', अशी विनंती याप्रश्नी आधीपासूनच प्रलंबित असलेल्या दोन जनहित याचिकांमध्ये बुधवारी तातडीच्या अर्जांद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली. त्यामुळे याप्रश्नी न्या. संभाजी शिंदे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिलीपराव आवाळे व शिवाजी पाटील यांनी ज्येष्ठ वकील अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याप्रश्नी दोन जनहित याचिका केलेल्या आहेत. तूर्तास तातडीचे कारण नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने आजपर्यंत या प्रक्रियेत हस्तक्षेप केला नव्हता. मात्र, आता शिफारस केलेल्या १२ जणांची नावे समोर आली असून त्यांच्या नियुक्त्या २१ नोव्हेंबरपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने याचिकादारांनी बुधवारी आपल्या याचिकांमध्ये दुरुस्ती करून तातडीचे अर्ज दाखल केले. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना शिफारस केलेल्यांमध्ये एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस), राजू शेट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस), यशपाल भिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस), आनंद शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), रजनी पाटील (काँग्रेस), सचिन सावंत (काँग्रेस), सय्यद मुझप्फर हुसैन (काँग्रेस), अनिरुद्ध वनकर (काँग्रेस), उर्मिला मातोंडकर (शिवसेना), चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना), विजय करंजकर (शिवसेना) व नितीन पाटील (शिवसेना) यांचा समावेश असल्याचे कळले आहे. यापैकी उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, नितीन पाटील व अनिरुद्ध वनकर हे कला क्षेत्राशी निगडित आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद १७१(५) अन्वये कला, साहित्य, सामाजिक कार्य, विज्ञान व सहकार चळवळ या क्षेत्रांना या १२ पदांवर प्रतिनिधित्व मिळणे अभिप्रेत आहे. इतर आठ जणांची नावे या क्षेत्रांशी निगडित नसून त्यांची या क्षेत्रात भरीव योगदान देणारे तज्ज्ञ म्हणून ओळख नाही. काहींनी यापूर्वी निवडणूक लढवून विधानसभा किंवा विधान परिषदेवर प्रतिनिधित्व केले आहे किंवा काही जण निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. काहींच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणे नोंद आहेत. त्याचीही छाननी झालेली दिसत नाही. केवळ राजकीय वरदस्त असल्याने राजकीय पुनर्वसन होण्यासाठी त्यांच्या नियक्त्या करण्यात येणार आहेत. परिणामी पुन्हा एकदा घटनात्मक तरतूद असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदार पदांवर राजकीय नियुक्त्याच होण्याची भीती आहे. त्यामुळे खडसे, शेट्टी यांच्यासह इतर आठ जणांना या पदांसाठी पात्र मानू नये, अन्यथा घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन होईल, असे आम्ही राज्यपालांनाही सविस्तर लेखी पत्राद्वारे निदर्शनास आणले आहे. मात्र, न्यायालयानेही यात तातडीने हस्तक्षेप करून लोकशाहीची वर्षानुवर्षे होत असलेली थट्टा थांबवणे आवश्यक आहे. या आठ जणांच्या नियुक्त्या करण्यास राज्यपालांना मज्जाव करावा अशी विनंती याचिकादारांनी दाखल याचिकेद्वारे केली आहे.

यापूर्वी जाहीर केलेला ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द
ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 


Thursday 19 November 2020

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक - 2020 ; पुण्याच्या मतदारांवर उमेदवारांची भिस्त

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक - 2020 ; पुण्याच्या मतदारांवर उमेदवारांची भिस्त

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांमध्ये अनुक्रमे चार लाख २६ हजार २५७ आणि ७२ हजार ५४५ मतदार मतदार झाले आहेत. दोन्ही मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार पुण्यातील असल्याने त्यांच्यावर सर्वच उमेदवारांची मदार अवलंबून आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मतदारांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांनी दाखल केलेले अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पदवीधर मतदारसंघात मतदारांची संख्या चार लाख २६ हजार २५७ झाली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार पुण्यातील असून, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ८९ हजार ५२९ आहेत. त्यानंतर सांगलीतील मतदारांची संख्या ८७ हजार २३३ झाली आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात ५९ हजार ७१ आणि सोलापूरमध्ये ५३ हजार ८१३ मतदारांनी नोंदणी केली आहे. पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि जनता दल सेक्युलरचे शरद पाटील हे तीनही उमेदवार सांगलीतील आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे उमेदवारांची मदार पुण्यावर अवलंबून असणार आहे; तसेच कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्यावर या उमेदवारांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शिक्षक मतदारसंघाचा निकालही पुण्यावर अवलंबून आहे. पुणे जिल्ह्यातील ३२ हजार २०१ मतदारांनी नावनोंदणी केली आहे. त्याखालोखाल सोलापूरमध्ये १३ हजार ५८४ आणि कोल्हापूरमध्ये १२ हजार २३७ मतदार आहेत. साताऱ्यात सात हजार ७११ आणि सर्वांत कमी सांगलीत सहा हजार ८१२ मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार सोलापूरमधील आहेत. काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर कोल्हापूरचे आहेत. 'मनसे'चे विद्यानंद मानकर आणि अपक्ष उमेदवार संतोष फाजगे पुण्यामधील उमेदवार आहे. या सर्व उमेदवारांची भिस्त पुण्यावर आहे. पुण्यातून सर्वाधिक मते घेणारा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुणेकर ठरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत सूचना जाहीर

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या कर्तव्‍ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्‍यात आल्‍या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. त्‍यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्‍याने ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्‍येय्य साध्‍य करण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कटीबद्ध आहे. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नेमण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे नुकतेच पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्‍त सौरभ राव, पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणूक निरीक्षक डॉ. निलीमा केरकेटा, शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे, पुण्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍यासह पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्‍हापूर येथील उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी, उप विभागीय अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्‍हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. निवडणूक कार्यक्रम- अधिसूचना प्रसिद्धी दिनांक 5.11.2020, नामनिर्देशन पत्र दाखल करणे दिनांक 12.11.20 पर्यंत, नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 13.11.2020, नामनिर्देशन पत्र मागे घेणे दिनांक 17.11.2020, मतदान दिनांक 1.12.20 आणि मतमोजणी दिनांक 3.12.2020 असा आहे. या निवडणुकीसाठी पुण्‍याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपायुक्‍त (सर्वसाधारण) संजयसिंह चव्‍हाण, पुण्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, साताऱ्याचे जिल्‍हाधिकारी शेखर सिंग, सांगलीचे जिल्‍हाधिकारी अभिजीत चौधरी, सोलापूरचे जिल्‍हाधिकारी मिलींद शंभरकर आणि कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी दौलत देसाई हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून खादी व ग्रामोद्योगच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. निलीमा केरकेटा या पदवीधर मतदार संघासाठी तर श्रीकांत देशपांडे हे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्‍हणून जबाबदारी पार पाडतील. निवडणुकीची ठळक वैशिष्‍ट्ये- मतपत्रिकेवर उमेदवाराच्‍या नावासमोर चिन्ह छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात १ पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा हिंदुस्थानी घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही हिंदुस्थानी भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत. मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळया स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा असतो. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्‍या 11 सप्‍टेंबर 2018 च्‍या निर्देशानुसार राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा (NOTA- None Of The Above) हा पर्याय वगळण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे – 1) निवडणूक साहित्य स्‍वीकृती व तपासणी 2) मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी 3) प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीची कामे 4) मतदानास प्रत्यक्ष सुरूवात व मतदान केंद्राध्यक्ष / कर्मचारी यांची कामे 5) मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही 6) महत्‍त्‍वाचे अहवाल/नमुने 7) मतदान साहित्‍य परत करणे, मतदान साहित्‍य तपासणी- तिसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी आपली नियुक्ती ज्या मतदान केंद्रावर करण्यात आली आहे, त्या मतदान केंद्राचे साहित्य आपणास संकलन केंद्रावरुन देण्यात येईल.‍ त्या ठिकाणावरुन आपण साहित्य प्राप्त करुन घ्यावे. प्राप्त साहित्य आपणास पुरविलेल्या यादीप्रमाणे योग्य व पुरेशा प्रमाणात असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच दोषपूर्ण व कमी असलेले साहित्य संकलन केंद्रावरील नेमून दिलेल्या कक्षातून बदलून / प्राप्त करून घ्यावे. मतदान प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले व मतदान केंद्रासाठी विशेषत्वाने नेमून दिलेले साहित्य काळजीपूर्वक तपासून घ्यावे. यामध्ये मतपेटी, मतपत्रिका, चिन्हांकित मतदार यादी, मतदार यादीची दुसरी प्रत, हिरवे पेपर सिल, विभेदक चिन्ह, पक्की शाई, जांभळ्या शाईचा स्केच पेन, कायद्याने विहित केलेले सर्व नमुने, लाख इत्यादी तपासून घेणे. मतदार यादी, विभेदक चिन्ह, ग्रीन पेपर सील यावर आपणास नेमून दिलेले मतदान केंद्र सुस्पष्ट नमूद असल्याची खात्री करावी. सर्व साहित्य बरोबर असल्याची व आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचीच असल्याची पुन्हा खात्री करून घ्यावी. मतपेटी सुस्थितीत व स्‍वच्‍छ असल्याची खात्री करणे. सर्व कळा/खटके (Hinges/Spring/ Mechanical Parts) कार्यरत असल्याची व मतपेटी व्यवस्थित बंद होत असल्याची खात्री करावी. पदवीधर मतदार संघासाठी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग पांढऱ्याच रंगाचे असतील. शिक्षक मतदार संघासाठी मतपत्रिका गुलाबी रंगाच्‍या असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग गुलाबी रंगाचे असतील. कोविड-19 (कोरोना)च्‍या प्रादुर्भावामध्‍ये निवडणूक घेतांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या दक्षता घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सर्व मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांच्‍यासाठी मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, ग्लोज पुरविले जातील. त्याचा वापर करावा. मतदानाच्‍या आदल्या दिवशी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घेणे अनिवार्य आहे. मतदान प्रक्रिया सुलभ होण्‍यासाठी मतदारांना जास्त वेळ रांगेत ताटकळत राहू लागू नये म्हणून त्यांना टोकण वितरण करण्‍यासाठी मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) राहील. त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. मतदान केंद्रावरील रांगेमधील मतदारांना रांगेत सामाजिक अंतर ठेवणे सुलभ जावे तसेच दिव्यांग व ज्‍येष्ठ नागरिक मतदार, पुरुष मतदार आणि स्त्री मतदार यासाठी मतदान केंद्रावर तीन स्वतंत्र रांगा व दोन व्यक्तीमधील सामाजिक अंतर 6 फुटाचे ठेवण्यासाठी या स्वतंत्र रांगेमध्ये 6 फुटाच्‍या अंतरावर चुना पावडरच्‍या सहाय्याने 15 ते 20 गोल वर्तुळे चिन्‍हांकित करावीत. ही कार्यवाही मतदान केंद्राच्‍या समोरील जागेतील जागा उपलब्धतेप्रमाणे करावी. मतदान केंद्राच्‍या इमारतीमध्ये किंवा परिसरात पुरुष व स्त्री मतदारासाठी दोन स्वतंत्र खोल्या प्रतीक्षा कक्ष म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात याव्यात. ज्यामध्ये खुर्ची, सतरंजी व इतर व्यवस्था ठेवण्यात येईल. मतदान केंद्रावर हात स्वच्छ करण्‍यासाठी मतदान केंद्राच्‍या येण्‍या-जाण्याच्‍या ठिकाणी साबण/हॅण्‍डवॉश व पाणी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. मतदान केंद्रामध्ये येण्या-जाण्याच्‍या ठिकाणी सॅनिटायझर ठेवले जाईल. आपल्याकडील साहित्यामधील कोविड-19 च्या प्रादुर्भाव संबंधाने जनजागृती बाबतचे भित्तीपत्रक मतदान केंद्राच्‍या परिसरात दर्शनी भागात लावले जातील. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था सामाजिक अंतराच्‍या निकषाप्रमाणे केंद्राध्यक्षांनी करून घ्यावी. मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यावर त्या मतदाराकडे मास्क नसल्यास त्यास मास्क पुरविण्यात यावा. मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्‍यापूर्वी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्‍या मार्फत थर्मल स्कॅनरच्‍या सहाय्याने तापमान तपासणी करावी. थर्मल स्कॅनरच्‍या तपासणीमध्ये मतदाराचे तापमान आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे म्हणजे 98.6 फॅरनहिट किंवा 37 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आढळल्यास अशा मतदाराचे तापमान पुन्हा दोनदा तपासण्यात यावे. संबंधिताचे तापमान पुन्हा 18.60F किंवा ३७०C पेक्षा अधिक दिसून आल्यास संबंधित मतदारास टोकण / प्रमाणपत्र देऊन त्यास मतदानासाठीच्या शेवटच्या तासात मतदानासाठी येण्यास सांगावे. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये अशा मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी सुविधा पुरविण्यात यावी. मतदाराची ओळख पटविण्याबाबत कार्यवाही करताना आवश्यकता असल्यास चेहऱ्यावरील मास्क खाली घेण्यासाठी सांगण्यात येईल. अलगीकरणातील कोविड-१९च्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या पर्यवेक्षणामध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोरपणे पालन करून मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये मतदान नोंदविण्‍यासाठी अनुमती द्यावी. क्षेत्रिय अधिकारी या संबंधाने त्यांच्‍या क्षेत्रातील मतदान केंद्राच्‍या बाबतीत आवश्यक समन्वय ठेवतील. मतदान प्रतिनिधीच्‍या तपासणी नंतर तापमान विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास त्यास बदली प्रतिनिधी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी व त्याप्रमाणे अभिलेख्यात त्याची नोंद घ्यावी. मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी- मतदान केंद्रावर पोहोचणे- आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य तपासून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. आपल्‍या मतदान केंद्रासाठी नियोजित वाहतूक आराखड्यानुसार पथकातील सर्व सदस्य, पोलीस कर्मचारी व साहित्य घेऊन नेमून दिलेल्या वाहनाद्वारे दि. 30.11.2020 रोजी मतदान केंद्रावर जावयाचे आहे. आपण मतदान केंद्रावर सर्व साहित्यानिशी सुखरूप पोहचल्याचा अहवाल क्षेत्रिय अधिकाऱ्यांना त्याच दिवशी द्यावयाचा आहे. मतदान केंद्रावर एक दिवस मुक्काम असल्यामुळे आवश्यक वैयक्तिक साहित्य सोबत ठेवावे. गरम पाण्‍याची वाफ घेण्‍यासाठी आवश्‍यक असणारे उपकरणही सोबत ठेवता येईल. मतदान केंद्रावर आपणांस स्थानिक कर्मचाऱ्यांचे सहाय्य देण्यात येईल. त्यांची आवश्यक ती मदत घ्यावी. मतदान केंद्रापासून २०० मीटरचे अंतर चुना फक्कीने चिन्हांकित करावे. मतदान केंद्रापासून २०० मीटरच्‍या आत काही प्रचार साहित्य असल्यास ते काढून टाकावे. मतदान केंद्रावर पोहोचल्याबाबतचा अहवाल क्षेत्रिय अधिकारी यांच्‍याकडे देणे. प्राप्त साहित्य तपासून घेणे. मतपेट्या सहज हाताळता येतात का हे पाहणे, साहित्य कमी असल्यास क्षेत्रिय अधिकारी यांच्‍याकडून प्राप्त करुन घेणे. मतदान केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा घोषणा किंवा चिन्ह असल्यास ते काढून टाकणे किंवा झाकून टाकणे, वर्तमानपत्रांनी ते झाकले असल्‍यास वर्तमानपत्र उलट्या बाजूने लावण्‍यात यावे. आवश्यक फर्निचर उपलब्धता- टेबल व साहित्याची व्यवस्थित रचना करणे. सूचना फलक तयार करणे, ज्यावर मतदान केंद्राचा तपशील व व्याप्ती (पोलींग एरिया), खोट्या मतदानाबाबत इशारा, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नमुना 7 ब मधील यादी, मतदारांना मत नोंदवण्‍याबाबतच्या सूचना, कोवीड- 19 बाबत जागृती फलक, धूम्रपान मनाई इशारा, मतदान केंद्राच्‍या समोर दर्शनी भागात प्रदर्शित करावे. मतदान केंद्राबाहेर 100 मीटर व 200 मीटर चुना पावडरने मार्किंग करून घेणे. 100 मीटरच्या आतील प्रचार साहित्य / फोटो इत्यादी काढणे. उमेदवाराचे तंबू / बुथ 200 मीटरच्या हद्दीबाहेर असल्याची खात्री करुन घेणे. प्रवेश, बाहेर, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान प्रतिनिधी, मतदान कक्ष इत्‍यादी फलक मतदान केंद्रात योग्य ठिकाणी लावावेत. मतदान केंद्राच्या बाहेर पुरुष, स्त्री, दिव्यांग / ज्‍येष्‍ठ नागरिक मतदार यांच्‍यासाठी तीन स्वतंत्र रांगांची आखणी करुन त्यामध्ये सामाजिक अंतरासाठी 6 फुटावर चुना पावडरच्या साह्याने गोल वर्तुळाची आखणी करणे. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था- प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल. आपल्‍या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आपणांस मतदान केंद्रावर जावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्‍या वेळी मतदान केंद्रामध्ये प्रवेश असणार नाही. नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लावणे, मतदान केंद्राच्‍या १०० मीटर परिसरात तोतयेगिरी वा निवडणूक प्रचार होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा मतदान केंद्रावर सूक्ष्‍म निरीक्षक (मायक्रो ऑब्‍झर्व्‍हर) नियुक्त असतील व ते ऑब्‍झर्व्‍हर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेवर जवळून लक्ष ठेवतील. तथापि, ते निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाहीत. अशा मतदान केंद्राला झोनल अधिकारी, पोलिस फिरते पथक वारंवार भेटी देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना त्यांची मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी व मतदान केंद्र माहीत होण्‍यासाठी मतदार सहायता कक्ष उभारण्यात येईल. मतदार सहायता कक्ष मतदान केंद्राच्या बाहेर आवश्यक कर्मचारी व साहित्यासह तयार करण्यात येईल. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्ये -तुमच्या मतदान पथकातील व्यक्तींशी तुम्ही परिचय करुन घेतला पाहिजे आणि मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती झाल्यापासूनच तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली पाहिजे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या संबंधातील सर्व सूचना तुम्ही स्वतः जवळ तयार ठेवल्या पाहिजे. तुमचे मतदान केंद्र कोठे आहे व तेथे जाण्या-येण्याचा मार्ग कोणता आहे, यासंबंधी तुम्हाला स्पष्ट कल्पना असावयास हवी. तुम्ही सर्व प्रशिक्षणाच्या वर्गाला न चुकता हजर राहिले पाहिजे. निवडणुकीसंबंधीचे साहित्य ताब्यात घेतांना आपणास सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत, याची तुम्ही खात्री करुन घेतली पाहिजे. मतपत्रिका, मतपेट्या, पेपर सील, मतदार यादीची चिन्हांकीत प्रत व दुसरी प्रत, मतदारासाठी जांभळ्या शाईचे स्केच पेन (Violet Colour SketchPen) विभेदक चिन्ह, कायद्याने विहित केलेले नमुने (Forms), लाख आणि पक्की शाई या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मतदान केंद्रावर आल्यावर, मतदान गुप्त राखले जाईल अशा रितीने मतदान केंद्राची उभारणी करणे, मतदारांना सामाजिक अंतर ठेऊन व्यवस्थित रांगेने उभे करुन त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, मतदानाचे कामकाज बाहेरील हस्तक्षेपापासून मुक्त ठेवणे यासाठी काय व्यवस्था करावयाची याची तुम्हाला स्पष्ट कल्पना असली पाहिजे. प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूवर मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची पूर्ण स्वाक्षरी करावयाची आहे. परंतु स्वाक्षरी स्थळप्रतीवर असता कामा नये. निश्चित केलेल्या वेळी मतदानास प्रारंभ करता यावा म्हणून काही मतपत्रिकांवर मागील बाजूस आगाऊ स्वाक्षऱ्या करुन ठेवाव्यात. प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूवर तसेच तिच्या स्थळप्रतीवर तुम्हास देण्यात आलेल्या रबरी शिक्क्याने तुमच्या मतदान केंद्राचे विभेदक चिन्हसुद्धा उमटविणे आवश्यक आहे. मतदारांच्या बोटावरील पक्की शाई सुकलेली आहे आणि बोटावर स्पष्ट व पक्की खूण झालेली आहे, याची खात्री करुन घेण्यासाठी मतदार हा मतदान केंद्र सोडून जाण्यापूर्वी शेवटच्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीची / मधल्या बोटाची परत तपासणी करणे इष्ट ठरेल. ज्या मतदाराला मतपत्रिका देण्यात आली आहे त्याने ताकीद मिळाल्यावरही मतदान केंद्रावर मतदान गुप्त राखण्यासंबंधातील कार्यपध्दतीचे पालन करण्यास नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका त्याने मत नोंदवलेले असो किंवा नसो तुम्ही किंवा तुमच्या सांगण्यानुसार मतदान अधिकाऱ्याने परत घ्यावी व त्यानंतर ती रद्द ठरवावी. मतदान सुरु होण्याच्‍या वेळी व मतदान संपल्यानंतर तुम्ही काही प्रतिज्ञापत्र भरावयाची असून त्यावर मतदान केंद्रात हजर असलेल्या मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावयाची आहे. तुम्हास देण्यात आलेल्या व अनुक्रमांकित असलेल्या मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीमध्ये संबंधित घटनांची नोंद त्या जशा घडतील त्या क्रमांकानुसार घ्यावयाची आहे. मतदान शांततेने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तुम्हाला मतदान केंद्रातील कामकाजाचे नियमन करावे लागेल. यासाठी तुम्हाला हिंमतीने तर वागावे लागेलच शिवाय तुम्ही स्वतः खंबीर व निःपक्षपाती असले पाहिजे. मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रात प्रत्येक उमेदवाराचा जो मतदान प्रतिनिधी हजर असेल त्याला मतपत्रिकांच्या हिशोबाच्या अधिप्रमाणित प्रती तुम्ही देणे आवश्यक आहे. निरनिराळ्या लिफाफ्यात निवडणूकविषयक कागदपत्रे मोहोरबंद करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे म्हणजे ज्या चुका पुढे सुधारता येणार नाहीत व टाळता येण्याजोग्या आहेत, अशा कोणत्याही चुका होणार नाहीत. मतदानानंतर मतपेट्या व इतर निवडणूक विषयक साहित्य नियोजित ठिकाणी रितसर पावती घेवून संबंधितांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी तुमची राहील. (मतदान अधिकारी यांची कामे) पहिला मतदान अधिकारी-मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यावर मतदार हा सर्वप्रथम थेट पहिल्या मतदान अधिकारी यांच्‍याकडे जाईल. मतदारास उमेदवार किंवा प्रतिनिधी यांच्‍याकडून अनौपचारिक ओळखपत्र चिठ्ठी दिली जाते (ओळखपत्र चिठ्ठी – साध्या पांढऱ्या कागदावर मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव नमूद असते. (परंतु राजकीय पक्षाचे नाव / उमेदवाराचे नाव नमूद नसावे) ओळखपत्र चिठ्ठीवरून मतदार यादीची चिन्हांकित प्रत पाहून मतदाराची ओळख पटविणे. निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्यासाठी दिलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मतदार दर्शवील त्यावरुन ओळख पटविण्याची कार्यवाही हा अधिकारी पूर्ण करेल. मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक आणि मतदाराचे नाव मतदान प्रतिनिधी व दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यास ऐकू जाईल एवढया मोठ्याने वाचून दाखवील. पुरुष मतदार असल्यास मतदार यादीच्या चिन्‍हांकित प्रतिमध्ये त्याच्या नावाखाली अधोरेखीत करेल. स्त्री मतदार असल्यास मतदाराच्या नावाखाली अधोरेखीत करुन मतदाराच्या नावाच्या डाव्या बाजूला बरोबरची (ü) अशी खूण करेल.फोटो ओळखपत्र (एपिक) नसलेल्या मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक इतर पुरावे- 1)आधार कार्ड 2) ड्रायव्हींग लायसन्स 3) आयकर ओळखपत्र (पॅनकार्ड ) 4)पासपोर्ट (पारपत्र) 5) केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था किंवा औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवाचे ओळखपत्र 6) खासदार/विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर / शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्‍थेत कार्यरत असलेल्या पदवीधर / शिक्षक मतदारांना वितरीत केलेले ओळखपत्र 8) विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र, टीप-ज्या मतदारांना निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे, त्‍यांनी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, असे ओळखपत्र सादर न करु शकणाऱ्या मतदारांनी वरीलपैकी एक पर्यायी फोटो ओळखपत्र त्यांची ओळख देण्‍यासाठी सादर करणे आवश्यक आहे. (निवडणूक आयोगाच्‍या दि.10/11/2020 रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशांप्रमाणे पहिला मतदान अधिकारी-पक्की शाई लावण्याची रीत-मतदाराची ओळख पटविल्यानंतर पदवीधर मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे हे पहिल्या मतदार अधिकाऱ्याचे प्रमुख काम राहील. (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्‍या दि. 9 नोव्‍हेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशांप्रमाणे मतदारास डाव्या हातावर बोटे नसतील तर पदवीधर मतदारसंघाकरीता मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे. पक्की शाई लावल्‍यानंतर पहिला मतदान अधिकारी मतदारास मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्‍याकडे जाण्यास सांगेल. दुसरा मतदान अधिकारी – दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे मतपत्रिकेचे गठ्ठे असतील. पदवीधर मतदारसंघासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल तर शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मोठ्याने वाचून दाखवलेला मतदाराचा मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर नोंदवून घेईल. मतपत्रिका स्थळ प्रतिपासून वेगळी करुन मतदारास देईल आणि त्याला मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे जाण्यास सांगेल. कोणत्याही मतदान प्रतिनिधीस मतपत्रिकेवरील अनुक्रमांकाची नोंद घेण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. यामुळे मतदान प्रक्रियेचा भंग होतो. मतदारास मतपत्रिका देणे- मतदाराला मतपत्रिका मत नोंदविण्यासाठी देण्यापूर्वी मतपत्रिकेच्या पाठीमागे स्थळ प्रतिवर व मतपत्रिकेवर उजव्या कोपऱ्यात विभेदक चिन्ह उमटवून मतपत्रिकेवरील विभेदक चिन्हाच्या खाली केंद्राध्यक्ष स्वाक्षरी करील. मतदाराला मतपत्रिका देण्‍यापूर्वी संबंधित मतदान अधिकारी चिन्‍हांकित मतदार यादीतील मतदाराचा मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक स्थळ प्रतीवर लिहील व त्यावर त्याची स्वाक्षरी घेईल. तिसरा मतदान अधिकारी –तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जांभळ्या शाईचे स्केचपेन व ढकल पट्टी असेल. तिसरा मतदान अधिकारी मतदाराकडून मतपत्रिका घेईल व मतपत्रिकेच्या मागच्या बाजूस वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर उमटवलेले विभेदक चिन्ह स्पष्ट दिसेल अशी मतपत्रिकेची उभी घडी व नंतर आडवी घडी अशी दोन वेळा घडी करील. त्यानंतर मतपत्रिकेची घडी उलगडून मतदारास देईल व मत नोंदवल्यानंतर परत त्याचप्रमाणे घडी करण्यास मतदारास सांगेल. मतपत्रिकेवर मत नोंदविण्याबाबत सूचना – मत नोंदविण्यासाठी मतदारास जांभळा स्केच पेन देवून मतदान कक्षात जाण्यास सांगेल. मतदान कक्षात मतदार ज्या उमेदवारास मत देऊ इच्छित असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनने फक्त एकाच अंकात पसंती क्रमांक दर्शवावा. पसंती क्रमांक फक्त अंकातच द्यावयाचा आहे. तसेच पसंतीचे अंक मराठी, इंग्रजी, रोमन किंवा हिंदुस्थानी घटनेच्या आठव्या अनुसूचीमधील कोणत्याही एका भाषेतील अंकात नमूद करावयाचे आहे. (उदा. रोमन-I, II, III, मराठी 1,2,3, – इंग्रजी 1, 2, 3). मतपत्रिकेवर एकापेक्षा अधिक उमेदवाराच्‍या नांवासमोरील रकान्यात एकसारखा पसंती क्रमांक देता येणार नाही. मतदारास पसंतीनुसार निवडणुकीस उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्‍या नावासमोर पसंतीचे आकडे लिहिलेल्या आकड्यापैकी एक अंक येईल. मतपत्रिकेवर पसंती क्रमांक व्यतिरिक्त इतर कोणताही मजकूर लिहू नये. मतदाराने मतपत्रिकेवर मतदान नोंदविल्यावर पूर्वीच्या घडीवर त्या मतपत्रिकेची घडी घालावी. त्यानंतर घडी केलेली मतपत्रिका मतदान कक्षातून बाहेर आणावी आणि मतपेटीत टाकावी. मतदार ही घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकेल व स्केच पेन तेथेच ठेवेल. मतदाराने खऱ्या मतपत्रिकेशिवाय इतर कोणतीही वस्तू अथवा कागद मतपत्रिकेत टाकता कामा नये, यासाठी मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्ह व केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी दिसेल अशा रितीने घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकण्याची प्रत्येक मतदाराला वेळोवळी सूचना देईल. यासाठी प्रत्येक मतदार मतपेटीमध्ये घडी केलेली मतपत्रिका टाकताना दक्ष राहून लक्ष ठेवील. मतपत्रिका मतपेटीत टाकल्यानंतर मतदार मतदान केंद्रातून बाहेर जाण्यापूर्वी त्याच्या बोटावरील पक्क्या शाईची खूण स्पष्टपणे उमटली असल्याची तसेच बोटावरील शाई पुसली नसल्याची खात्री करेल. मतदान सुरु करण्यापूर्वीची तयारी – 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान सुरुवात करण्यापूर्वी किमान 45 मिनिटे अगोदर म्हणजे सकाळी 7.15 वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यावर हजर होणे आवश्यक आहे.

पदवीधर मतदारसंघ

जिल्हा - मतदारसंख्या

पुणे - एक लाख ३६ हजार ६११

कोल्हापूर - ८९ हजार ५२९

सांगली - ८७ हजार २३३

सातारा - ५९ हजार ७१

सोलापूर - ५३ हजार ८१३

एकूण - चार लाख २६ हजार २५७

शिक्षक मतदारसंघ

जिल्हा - मतदारसंख्या

पुणे - ३२ हजार २०१

सोलापूर - १३ हजार ५८४

कोल्हापूर - १२ हजार २३७

सातारा - सात हजार ७११

सांगली - सहा हजार ८१२

एकूण - ७२ हजार ५४५

पुण्यात पुरवणी यादीच्या रूपाने पदवीधर- ८३ हजार ७६२ तर शिक्षक- १३ हजार ८१५ मतदारांची भर

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील चुरस वाढल्याने राजकीय पक्षांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव केल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघांमध्ये ९७ हजार ५७७ मतदार वाढले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत दाखल केलेले ऑनलाइन अर्ज मंजूर झाल्याने पदवीधर मतदारसंघात ८३ हजार ७६२ आणि शिक्षक मतदारसंघामध्ये १३ हजार ८१५ मतदारांची भर पडली आहे. या दोन्ही मतदारसंघांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी आलेल्या अर्जांमुळे पुण्यात पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ३६ हजार ६११ आणि शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण ३२ हजार २०१ मतदार झाल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार पदवीधर मतदारसंघामध्ये ५२ हजार ८४९ आणि शिक्षक मतदार संघामध्ये १८ हजार ३८६ मतदारांची नोंदणी झाली होती. राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी केलेल्या धावपळीमुळे सुमारे ९७ हजार ५७७ मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही मतदार संघांची निवडणूक जून महिन्यात होणार होती. मात्र, करोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली. डिसेंबर २०१९मध्ये दोन्ही मतदारसंघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. एक जानेवारी २०२० पासून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. संबंधित मतदारांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यात आल्याने राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी जोर लावला. त्यामुळे दोन्ही मतदार संघांमध्ये ९७ हजार ५७७ मतदार वाढले आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 

Wednesday 11 November 2020

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन न्यूज पोर्टलवर राहणार अंकुश; केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी

माहिती व प्रसारण विभागाकडून डिजिटल सामग्रीचे नियमन व नियंत्रण करण्याचा निर्णय

ऑनलाइन न्यूज पोर्टल, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्र सरकारची नजर राहणार आहे. यासंबंधीची एक अधिसूचना केंद्र सरकारने बुधवारी जारी केली. यानुसार ऑनलाइन न्यूज पोर्टल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत राहणार आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन ठरलेल्या नेटफिक्स, अॅमेझॉन प्राईमसह सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टलवर आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाची नजर असणार आहे. केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म व ऑनलाईन न्यूज पोर्टल माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची सुधारित अधिसूचनाही राष्ट्रपतींकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, अल्ट बालाजी यासह सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म्संना स्वतंत्र स्वायत्त संस्थेच्या नियंत्रणाखाली आणण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले होते. त्यानंतर केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टल्स माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा विचार सुरू केला होता. अखेर यासंदर्भातील सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे असलेल्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, झी ५ आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या सेल्फ रेग्युलेशनवर स्वाक्षरी केलेली नाही, असा आरोपही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला होता.सध्या डिजिटल कटेंटवर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा किंवा स्वायत्त संस्था नाही. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया प्रिंट मीडियावर, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (एनबीए) न्यूज चॅनेलवर, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया जाहिरातींवर तर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चित्रपटाच्या कंटेटवर अंकुश ठेवते. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वायत्त मंडळाने ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करावे यासंदर्भातील याचिकेवर केंद्राचा प्रतिसाद मागविला होता. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया यांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 

Tuesday 3 November 2020

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर

राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर झाली आहे. या 5 जागांसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार होईल. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रथमच लढत होणार आहे. 1 डिसेंबरला होणारी निवडणूक औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघासाठी होईल. यापूर्वी भाजप-शिवसेना युतीमध्ये एकत्र होते. पण, यंदा भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे तीन पक्ष पाहायला मिळतील. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक १ डिसेंबरला होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांतील निवडणूक करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या पाचही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींची मुदत १९ जुलैला संपली होती. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पाचही मतदारसंघात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. १२ नोव्हेंबपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. १ डिसेंबरला मतदान तर ३ तारखेला मतमोजणी होईल. पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. गेल्या वेळी राष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरीमुळे आ.चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळाला होता. या वेळी भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस आहे. राष्ट्रवादीने गतवेळची चूक टाळून सहमती घडविण्यावर भर दिला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी केले होते. त्यांनी पुन्हा लढण्याची तयारी केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित सामोरी जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================