Sunday 6 October 2024

Maharashtra Vidhansabha Election Opinion polls 2024; पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या (ओपिनियन पोल) जनमत चाचणी सर्वेक्षणातील अंदाज पहा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणीचे निष्कर्ष

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविण्यात प्राविण्य मिळविलेल्या पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडून राज्यात मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मतदारांचे मत आजमावून घेतले. या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल)मध्ये धक्कादायक निष्कर्ष आलेले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार राज्यात महाविकास आघाडीचाच सर्वाधिक प्रभाव या निवडणुकीत राहणार आहे असा अंदाज निष्कर्षातून व्यक्त होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण भाजप-22.83% तर कॉंग्रेस-18.42% आणि शिवसेना-11.74% तर शिवसेना (उबाटा)-15.24% आणि राष्ट्रवादी-8.48% आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-13.71 तसेच अन्य राजकीय पक्ष, अपक्ष व नोटासह 9.58% असे संभाव्य मतांचे प्रमाण राहील असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तविण्यात येत आहे. महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 43.05 टक्के इतके तर महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 47.37 टक्के इतके राहण्याची शक्यता मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार व्यक्त होत आहे. 

मतदारांचा कल आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर आधारित राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांचे सर्वाधिक विजयी होण्याचे तुलनात्मक प्रमाणात (स्ट्राईक रेट) मध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सरस ठरणार आहे. मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) मध्ये पक्ष निहाय भाजप पक्षाचे मतांचे प्रमाण अन्य पक्षांच्या तुलनेत जास्तीचेच राहणार आहे मात्र मागील निवडणुकांच्या तुलनेत जनाधारात घट होण्याचा संभव आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर स्ट्राईक रेट अवलंबून राहणार आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि प्रमुख शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील विभाजन, फाटाफूटीचा लाभ कोणाला मिळणार यासह अन्य प्रमुख निष्कर्ष प्राब संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात पाहण्यास मिळेल.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 नंतरच्या काळात राजकारणातील घडामोडींमध्ये झपाट्याने धक्कादायक बदल होत गेले. बदलत्या राजकीयदृष्ट्या समीकरणांमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात देखील अमुलाग्र बदल झाले त्याचा थेट परिणाम राजकीय पक्षांच्या जनाधारात परिवर्तीत होत गेले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मधील निकालापूर्वीच आत्मसन्मानाची बीजे रोवली होती असे नंतर स्पष्ट झाले होते. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १६४ जागा लढवून १०५ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 25.75 टक्के इतके होते. अर्थातच युती मध्ये निवडणूक लढवली होती. शिवसेनेने १२४ जागा लढवून ५६ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 16.41 टक्के इतके होते.
 
राष्ट्रवादीने १२१ जागा लढवून ५४ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 16.71 टक्के इतके होते. काँग्रेसने १४७ जागा लढवून ४४ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 15.87 टक्के इतके होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०१ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 2.25 टक्के इतके होते. एमआयएमने ४४ जागा लढवून २ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 1.34 टक्के इतके होते. शेकापने २४ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 0.97 टक्के इतके होते. स्वाभिमानी पक्षाने ५ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 0.40 टक्के इतके होते. वंचित बहुजन आघाडीने २३६ जागा लढवून एकही जागेवर यश मिळाले नाही मात्र मतांचे प्रमाण 4.58 टक्के इतके होते. राष्ट्रीय समाज पक्षाने ६ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण केवळ 0.15 टक्के इतके होते. 

निकालानंतर शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली आणि आघाडीच्या पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत बंड होऊन 2 गटांमध्ये विभाजन झाले यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार व उद्धव ठाकरे यांच्याकडे उर्वरित आमदार राहिले. शिवसेनेपाठोपाठ कालांतराने राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गटांमध्ये विभागणी होऊन अजित पवार यांच्या गटाकडे 40 आमदार तर उर्वरीत आमदार शरद पवार यांच्याकडे राहिले. भाजपने शिंदे यांची सेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट एकत्रितरीत्या महायुती नावाने सत्ता उपभोगत असून सार्वजनिक लोकसभा निवडणुकांना प्रथमच सामोरे गेले आणि जनतेने त्यांच्या विरोधात कौल दिला. बहुतांश जागा महायुतीला गमवाव्या लागल्या आहेत त्यामुळे प्रामुख्याने भाजपला धक्का बसला आहे. मुळातच महायुतीचे राजकीय मिश्रण मतदारांना रुचले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राजकारणात जसे वारे वाहते तसा पक्षांतराचा प्रवाह प्रवाहित होतो आणि महाविकास आघाडीकडे राजकीय महत्वाकांक्षा असलेले उपेक्षित नेते आकर्षित झालेले पहावयास मिळत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सद्यस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुड फीलचे वातावरण आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक घटकांच्या विविध मागण्या व विरोधाचा परिणाम महायुतीच्या पराभवात दिसून आला त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना मतदारांचा कल कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडून करण्यात आला. मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) मध्ये स्थानिक पातळीवरील मतदारांची व राजकीय पदाधिकाऱ्यांची सद्यस्थितीत असलेले मत आजमावून घेतले त्याचा निष्कर्ष अहवालात दिलेला आहे.

मतदारांनी दिलेल्या कल व पसंती नुसार राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण वरीलप्रमाणे विषद करण्यात आलेले असून साधारण स्ट्राईक रेट प्रमाणे जागा मिळतील यामध्ये 2 ते 7 टक्के कमी-जास्त होऊ शकतात. भाजप- 65 ते 70 तर शिवसेना(शिंदे)- 25 ते 35 आणि राष्ट्रवादी(अजित पवार)- 15 ते 20 तसेच अन्य घटक पक्ष- 5 ते 10 असे महायुतीचे किमान 110 तर कमाल 135 पर्यंत संभाव्य जागा येऊ शकतील असा निष्कर्ष निघत आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस- 55 ते 60 व शिवसेना(ठाकरे)- 35 ते 40 आणि राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार)- 60 ते 65 तसेच आघाडीतील घटक पक्ष व अन्य- 3 ते 13 असे महाविकास आघाडीचे किमान 153 तर कमाल 178 पर्यंत संभाव्य जागा येऊ शकतील असा निष्कर्ष या ओपिनियन पोल मधून निघत आहे. यामध्ये जागावाटप व अन्य परिणामकारक घाडमोडीनंतर बदल होऊ शकतात. 

2019 च्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 जागांपैकी रिक्त झालेल्या 6 मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात आल्या तर लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने 7 आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने सद्यस्थितीत सदर जागा रिक्त आहेत तर कॉंग्रेसच्या एका आमदाराने राजीनामा देऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने एक जागा रिक्त असून अन्य काही जागांमध्ये निधनाने रिक्त आहेत. 

विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून कोणत्या पक्षाकडे जागा जाते हे निश्चित झाल्यानंतर लढत स्पष्ट होईल तेव्हा संभाव्य अंदाजातील अचूकता निष्पन्न होईल. मतदारांचा कल जाणून घेताना राजकीय पक्ष आणि स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी यांची पसंती आजमावून घेतली जाते त्यावरून संभाव्य मतांचे प्रमाण ठरते. प्राब संस्थेकडून मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) घेऊन स्थिती स्पष्ट केलेली असून स्थानिक पातळीवर पक्षांतर, बंडखोरी, उमेदवारी वाटप, सामाजिक समीकरणांवर तेथील संभाव्य यश अवलंबून राहणार आहे. या सर्वेक्षणाचा जागावाटप व उमेदवार निवडीसाठी राजकीय पक्ष व इच्छुकांना उपयुक्त अहवाल आहे. या अहवालाच्या आधारावर उमेदवारीवर दावा केला जाऊ शकतो व सत्य वस्तुस्थिती काय आहे हे देखील स्पष्ट होते.

महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, चौथी आघाडी, वंचित, मनसेसह यांचा तसेच सामाजिकदृष्ट्या मराठा, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम या प्रमुख घटकांचा देखील समावेश सर्वेक्षणात अंतर्भूत केलेला आहे.

सूचना- पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या (ओपिनियन पोल) जनमत चाचणी सर्वेक्षणातील अहवालामधील केवळ थोडक्यात सारांश देण्यात आलेला असून विधानसभा मतदारसंघ निहाय तपशीलवार रिपोर्ट सशुल्क उपलब्ध करून दिला जाईल याकरिता प्राब संस्थेशी संवाद साधावा.  

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.