Thursday 6 June 2024

Lok Sabha Election Results 2024 : महायुतीच्या पराभवाला केवळ मराठा नव्हे तर ओबीसींची नाराजी देखील कारणीभूत

महाराष्ट्रात सर्वाधिक 26 मराठ्यांचे खासदार तर ओबीसींचे 9 खासदार संसदेत

राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचेच वर्चस्व 

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे राजकारण लोकसभा निवडणुकीत जातीयवादाने घेरले असून सामाजिक आरक्षणाच्या आंदोलनाच्या संघटनात्मक चळवळीमुळे मतदारांमध्ये जातीय भावना वाढविण्यास कारणीभूत ठरल्याने त्याचा परिणाम निकालातून दिसून येत आहे. तसेच संविधान बदलणार, मनुस्मृती श्लोक अभ्यासक्रमात घेणार अशा वावड्या निवडणुकीच्या प्रचारात उठवून झालेल्या अपप्रचाराचा सर्वाधिक फटका भाजपसह महायुतीच्या अन्य पक्षांना बसला असल्याचे समोर आले आहे.
 
कॉंग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत मात्र त्यांच्या जनाधारात कोणतीही वाढ झाल्याचे निकालातील मतांच्या प्रमाणातून दिसून येत नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनात्मकदृष्ट्या मिळालेल्या मतांचे प्रमाण आणि 2024 च्या निवडणूकीतील प्रमाण एकसारखेच आहे. तर भाजपच्या मतांच्या प्रमाणात केवळ 1.66 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही शिवसेनेच्या मतांच्या प्रमाणात 6.17 टक्के वाढ झालेली असून दोन्ही राष्ट्रवादीच्या 3.21 टक्के इतकी मतांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.  
 
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर 37 मतदारसंघात ज्या विरोधी पक्षाच्या चिन्हाच्या विरोधात निवडून आलेल्या विद्यमान आमदारांना त्यांना मतदान करा असे आवाहन करण्याची वेळ आल्याने ते प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा देखील मोठा फटका महायुतीला बसला आहे. राजकीय पक्षांची फुट पाडणे देखील भाजपला भोवले आहे. मोदी, फडणवीस यांच्या व्यक्ती रोषासह ओबीसी नेत्यांना निवडणूक प्रचारापासून दूर ठेवणे देखील महायुतीला भोवले आहे. महायुतीच्या धक्कादायक पराभवाला प्रमुख कारणांमध्ये मराठा आंदोलकांचा रोष मानला जात असला तरी वास्तविकपणे ओबीसींची नाराजी देखील कारणीभूत असल्याचे विभाग नुसार निकालांमधून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 26 मराठ्यांचे खासदार तर ओबीसींचे 9 खासदार या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. सर्वाधिक बीड, परभणी, औरंगाबाद या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होती येथे तीव्र जातीयवादाची किनार निवडणुकीला होती. जालना मतदारसंघात दानवे यांना ओबीसींच्या नाराजीचा तीव्र फटका बसला आहे. अन्य सामाजिकदृष्ट्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये ब्राह्मण समाजाचे 2 तर जैन समाजाचे 1 खासदार निवडून आले असून अनुसूचित जमातींचे 4 आणि अनुसूचित जातींचे 6 खासदार राज्यातून संसदेत प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यात 9 मतदारसंघ राखीव आहेत त्या व्यतिरिक्त अराखीव अशा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या वर्षाताई गायकवाड या एकमेव निवडून आलेल्या आहेत.

नवनिर्वाचित खासदार व त्यांचा सामाजिकदृष्ट्या वर्गीकरण

क्र

मतदारसंघ

विजयी उमेदवार

विजयी पक्ष

सामाजिक वर्ग

1

नंदुरबार

गोवाल कागदा पाडवी

कॉंग्रेस

एसटी

2

धुळे

बच्छाव शोभा दिनेश

कॉंग्रेस

मराठा

3

जळगाव

स्मिता उदय वाघ

भाजप

मराठा

4

रावेर

खडसे रक्षा निखिल

भाजप

ओबीसी

5

बुलढाणा

जाधव प्रतापराव गणपतराव

शिवसेना

मराठा

6

अकोला

अनुप संजय धोत्रे

भाजप

मराठा

7

अमरावती

बळवंत बसवंत वानखडे

कॉंग्रेस

एससी

8

वर्धा

अमर शरदराव काळे

राष्ट्रवादी (एसपी)

ओबीसी

9

रामटेक

श्यामकुमार (बाबालू) दौलत बर्वे

कॉंग्रेस

एससी

10

नागपूर

नितीन जयराम गडकरी

भाजप

 ब्राह्मण

11

भंडारा गोंदिया

डॉ. प्रशांत यादराव पडोळे

कॉंग्रेस

ओबीसी

12

गडचिरोली - चिमूर

डॉ. किरसन नामदेव

कॉंग्रेस

एसटी

13

चंद्रपूर

धनोरकर प्रतिभा सुरेश

कॉंग्रेस

ओबीसी

14

यवतमाळ- वाशीम

संजय उत्तमराव देशमुख

शिवसेना (उबाठा)

मराठा

15

हिंगोली

आष्टीकर पाटील नागेश बापूराव

शिवसेना (उबाठा)

मराठा

16

नांदेड

चव्हाण वसंतराव बळवंतराव

कॉंग्रेस

मराठा

17

परभणी

जाधव संजय (बंडू) हरिभाऊ

शिवसेना (उबाठा)

मराठा

18

जालना

कल्याण वैजिनाथराव काळे

कॉंग्रेस

मराठा

19

औरंगाबाद

भुमरे संदिपनराव आसाराम

शिवसेना

मराठा

20

दिंडोरी

भास्कर मुरलीधर भगरे

राष्ट्रवादी (एसपी)

एसटी

21

नाशिक

राजाभाऊ प्रकाश वाजे

शिवसेना (उबाठा)

मराठा

22

पालघर

डॉ. हेमंत विष्णू सावरा

भाजप

एसटी

23

भिवंडी

सुरेश गोपीनाथ म्हात्रे

राष्ट्रवादी (एसपी)

ओबीसी

24

कल्याण

डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे

शिवसेना

मराठा

25

ठाणे

नरेश गणपत म्हस्के

शिवसेना

मराठा

26

मुंबई उत्तर

पियुष गोयल

भाजप

जैन

27

मुंबई उत्तर पश्चिम

रवींद्र दत्ताराम वायकर

शिवसेना

ओबीसी

28

मुंबई ईशान्य

संजय दिना पाटील

शिवसेना (उबाठा)

ओबीसी

29

मुंबई उत्तर मध्य

गायकवाड वर्षा एकनाथ

कॉंग्रेस

एससी

30

मुंबई दक्षिण मध्य

अनिल यशवंत देसाई

शिवसेना (उबाठा)

सारस्वत ब्राह्मण

31

मुंबई दक्षिण

अरविंद गणपत सावंत

शिवसेना (उबाठा)

मराठा

32

रायगड

तटकरे सुनील दत्तात्रेय

राष्ट्रवादी

ओबीसी

33

मावळ

श्रीरंग आप्पा चंदू बारणे

शिवसेना

मराठा

34

पुणे

मुरलीधर मोहोळ

भाजप

मराठा

35

बारामती

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी (एसपी)

मराठा

36

शिरूर

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे

राष्ट्रवादी (एसपी)

ओबीसी

37

अहमदनगर

निलेश ज्ञानदेव लंके

राष्ट्रवादी (एसपी)

मराठा

38

शिर्डी

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे

शिवसेना (उबाठा)

एससी

39

बीड

बजरंग मनोहर सोनवणे

राष्ट्रवादी (एसपी)

मराठा

40

उस्मानाबाद

ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर

शिवसेना (उबाठा)

मराठा

41

लातूर

डॉ. काळगे शिवाजी बंडप्पा

कॉंग्रेस

एससी

42

सोलापूर

प्रणिती सुशीलकुमार शिंदे

कॉंग्रेस

एससी

43

माढा

मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह

राष्ट्रवादी (एसपी)

मराठा

44

सांगली

विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील

अपक्ष

मराठा

45

सातारा

श्रीमंत छ.उदयनराजे भोंसले

भाजप

मराठा

46

रत्नागिरी- सिंधुदुर्ग

नारायण तातू राणे

भाजप

मराठा

47

कोल्हापूर

छत्रपती शाहू शहाजी

कॉंग्रेस

मराठा

48

हातकणंगले

धैर्यशील संभाजीराव माने

शिवसेना

मराठा


राज्यात एसटींसाठी राखीव असलेल्या नंदुरबार, पालघर, दिंडोरी, गडचिरोली चिमूर या मतदारसंघांपैकी दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत. यामध्ये नंदुरबारची जागा काँग्रेसने एक लाख 59 हजार 120 मतांनी जिंकली आहे. गडचिरोली चेंबूर लोकसभा मतदारसंघ सुद्धा काँग्रेसने जिंकला असून या जागेवरती एक लाख 41 हजार 696 मतांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जागा 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडे होत्या. मात्र, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने थेट लढतीत भाजपला पराभवाचा धक्का दिला आहे.  पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विजय मिळवला असून या जागेवर ठाकरेंचा खासदार 2019 मध्ये होता. भाजपने ही जागा एक लाख 83 हजार 3306 मतांनी जिंकली आहे. 

दुसरीकडे एससीसाठी राखीव असलेल्या अमरावती, रामटेक, लातूर, सोलापूर या चार जागांवरती काँग्रेसने विजय मिळवला आहे. यामध्ये सुद्धा भाजपकडून दोन जागा खेचल्या आहेत. नवनीत राणांचा पराभव करत अमरावतीची जागा सुद्धा भाजपकडून आपल्याकडे घेण्यात काँग्रेसला यश आले आहे. दुसरीकडे शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवाराने आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांचा पराभव करत जागा खेचून आणली आहे.

अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसने 19 हजार 731 मतांनी विजय मिळवला. रामटेकमध्ये काँग्रेसने 76 हजार 768 मतांनी विजय मिळवला,. तर लातूरमध्ये 61881 मतांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये 74,197 मतांनी विजय मिळवत राज्यातील राखीव जागांवर झेंडा प्रस्थापित केला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या संविधान बचाव हाकेला साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून प्रवेश करत महाराष्ट्रात आली होती. या ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे. 

राज्यात भाजपला ९ जागांवर यश मिळाले, तर शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर यश मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसने १३, उद्धव ठाकरे गटाने ९ तर शरद पवार गटाने ८ जागांवर यश मिळवले आहे. सांगलीची एक अपक्ष जागा निवडून आलेली आहे. महाराष्ट्रात एनडीएला १७ तर इंडिया आघाडीला ३० जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये भाजपला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागत आहे. 

2019 च्या निवडणुकीच्या राजकीय पक्ष निहाय मिळालेल्या मतांच्या प्रमाणाची तुलना केल्यास कॉंग्रेसच्या मताधिक्यात अंशतः फरक पडला आहे. 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 16.41 टक्के मते मिळाली होती तर 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत 16.92 टक्के मते मिळाली आहेत. केवळ 0.51 टक्के मतांच्या प्रमाणात वृद्धी झाल्याचे दिसून येत आहे मात्र उमेदवार जिंकण्याचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असून 13 जागांवर उमेदवार निवडून आलेले आहेत. हीच स्थिती गेल्या निवडणुकीत उलट होती. गेल्या 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 16.41 टक्के मते मिळवून केवळ एकाच खासदार निवडून आलेला होता तेंव्हा जिंकण्याचा स्ट्राईक रेट नगण्य कॉंग्रेसचा नगण्य होता. भाजपला 2019 च्या निवडणुकीत 27.84 टक्के मते मिळाली होती तर 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत 26.18 टक्के मते मिळाली आहेत. केवळ 1.66 टक्के मतांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे मात्र उमेदवार जिंकण्याचा स्ट्राईक रेट नगण्य असून केवळ 9 जागांवर उमेदवार निवडून आलेले आहेत. 

शिवसेनेला 2019 च्या निवडणुकीत 23.5 टक्के मते मिळाली होती तर 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे) 12.95 टक्के तर शिवसेना (ठाकरे) 16.72 टक्के मते मिळालेली आहेत. शिवसेना (ठाकरे) यांच्या पक्षाला शिंदेंच्या सेने पेक्षा 4 टक्के मते जास्त मिळालेली आहेत. दोन्ही शिवसेनेला 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 6.17 टक्के मतांमध्ये वाढ झालेली आहे. 2024 मध्ये 29.67 टक्के मते दोन्ही शिवसेनेला मिळालेली आहेत.   
  
राष्ट्रवादी पक्षाला 2019 च्या निवडणुकीत 15.66 टक्के मते मिळाली होती तर 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित) 8.60 टक्के तर राष्ट्रवादी (एसपी) 10.27 मते मिळालेली आहेत. राष्ट्रवादी (एसपी) यांच्या पक्षाला अजित दादांच्या पक्षा पेक्षा 2 टक्के मते जास्त मिळालेली आहेत. मात्र राष्ट्रवादी (एसपी) पक्षाने 10 जागा तर अजित दादांच्या राष्ट्रवादीने केवळ 4 जागा लढवलेल्या आहेत. त्या तुलनेत अजित दादांच्या राष्ट्रवादीला मतांचे प्रमाण अधिक आहे. दोन्ही राष्ट्रवादी 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 3.21 टक्के मतांमध्ये वाढ झालेली आहे. 2024 मध्ये 18.87 टक्के मते दोन्ही राष्ट्रवादीला मिळालेली आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षांनी किती जागांवर निवडणुका लढवल्या हे देखील तुलनात्मक दृष्ट्या जाणून घेऊन त्यांच्या जनाधारात किती घट व वृद्धी झाली आहे हे पहाणे देखील निष्कर्षाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. 

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने केलेल्या घोडचुका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा केल्यास या निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते. केवळ ओबीसी किंवा मराठा समाजाचा प्रदेशाध्यक्ष केला म्हणजे सर्व समाज त्या पक्षाच्या पाठीमागे जातो असा भ्रम पक्षश्रेष्ठींनी काढून टाकला पाहिजे. महत्वाचे त्या पक्षाचा सक्षम निर्णय घेणारा नेता कोण आहे हे देखील मतदार जाणून असतात हे या निवडणुकीच्या निकालातून अधोरेखित झालेले आहे.  

वंचित बहुजन आघाडीच्या जनाधारात घट

वंचित बहुजन आघाडीला 38 लोकसभा मतदारसंघात 15 लाख 82 हजार 855 मते मिळाली आहेत. 21 लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर उमेदवार आहेत. बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे हक्काच्या दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाने पाठ फिरवलेली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीला फारसे महत्व उरणार नाही. मात्र उपद्रवी मूल्य राखून असेल. वंचितने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६.९८ टक्के मते घेतल होती. यंदा वंचितला अवघी ३.६७ टक्के मते मिळाली आहेत. या लोकसभेला वंचितने राज्यात ३७ उमेदवार उभे केले होते. वंचितच्या उमेदवारांची मतांची बेरीज १५ लाख ९५ हजार ४०१ (३.६७ टक्के) भरते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला ३७ लाख ४३ हजार ५६० मते होती. मतांची टक्केवारी ६.९८ इतकी होती.आघाडीला चार जागा कमी पडल्या. मात्र या चार जागा कमी  होण्यास वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते कारणीभूत ठरल्याचेही आता स्पष्ट होत आहे. राज्यातल्या चार मतदार संघात याचा आघाडीला फटका बसला. वंचित मुळे चार मतदारसंघात आघाडीचे उमेदवार पराभूत झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.  

वंचित मुळे आघाडीच्या चार जागा हातच्या गेल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यात अकोला, बुलढाणा, उत्तर पश्चिम मुंबई आणि  हातकणगले या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. अकोल लोकसभेत काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या अनुप धोत्रे यांनी 40 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. येथे वंचितचे प्रकाश आंबेडकर हे मैदानात होते. त्यांनी जवळपास दोन लाखाच्या आसपास मते घेतली. प्रकाश आंबेडकर हे आघाडीत असते तर ते विजयी झाले असते. किंवा काँग्रेसचा उमेदवार सहज विजयी झाला असता. मात्र मत विभाजनामुळे आघाडीच्या उमेदवाराला इथे फटका बसला.    

बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा 29000 मतांनी पराभव केला. या मतदार संघातही वंचित फॅक्टर खेडेकरांच्या पराभवाला कारणीभूत ठरला आहे. वंचितचे उमेदवार वसंतराव मगर यांनी तब्बल 98 हजार मते घेतली आहेत. तर हातकणगले लोकसभा मतदार संघातही वंचितच्या उमेदवारामुळे आघाडीच्या उमेदवाराला पराभव सहन करावा लागाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशिल माने यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा निसटत्या फरकाने म्हणजे 13,000 हजाराने पराभव केला. येथे वंचितकडून डी. सी. पाटील मैदानात होते. त्यांनी तब्बल 32 हजार 696 मते घेतली. त्याचा थेट फटका सत्यजित पाटील यांना बसला. या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही मैदानात होते. त्यांनाही 1 लाख 79 हजार 850 मते मिळाली आहेत. त्यांनी ही आघाडीला मदत केली असती किंवा आघाडी उमेदवारी म्हणून मैदानात उतरले असते तर त्यांचाही विजय पक्का झाला असता. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना अवघ्या 48 मतांनी पराभव पत्करावा लागला. येथे शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र वायकर हे विजयी झाले. या मतदार संघातही वंचितचा फॅक्टर चालला. वंचितचे परमेश्वर अशोक रणशौर हे मैदानात होते. त्यांना दहा हजारा पेक्षा जास्त मते येथे मिळाली आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत वंचितमुळे नांदेड,सोलापूर, सांगली, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलढाणा, हातकणंगले या ७ मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागले होते. यंदा बुलढाण्यात वंचित उमेदवाराने ९८ हजार मते घेत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांच्या पराभवात वाटा उचलला. उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याचा प्रकाश आंबेडकर यांना राग होता. त्यातून त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधात रणनीती आखली होती. वंचितला विधानसभा महाविकास आघाडीतून लढवण्याची इच्छा आहे. पण, वंचितचा घसरलेला मतटक्का पाहून आघाडीमध्ये वंचितला स्थान मिळेल का याविषयी मात्र साशंका आहे. वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सात जागांवर उमेदवार न देता, तिथे इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका उमेदवाराचाही समावेश होता.

लोकसभा निवडणूकीत 55 वकीलांचा सहभाग एकाला यश 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये महाराष्ट्रातून 31 लोकसभा मतदारसंघातून तब्बल 55 वकील निवडणूक रिंगणात होते. एकमेव वकील गोवाल पाडवी हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर 7 लाख 45 हजार 998 (53.53%) मतांनी निवडून आले असून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून उज्वल निकम दुसऱ्या क्रमांकाची 4 लाख 29 हजार 031 (47.12%) मते मिळवली आहेत. तर मुंबई उत्तर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या सोनल दिवाकर गोणदाणे तिसऱ्या क्रमांकाची 6 हजार 052 (0.58%) मते मिळवली आहेत. 31 लोकसभा मतदारसंघातून 55 वकीलांनी निवडणूक लढवली यामध्ये 17 वकील उमेदवारांनी विविध राजकीय पक्षातून तर 34 जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या 55 वकीलांना एकूण 12 लाख 72 हजार 744 मते मिळाली असून त्यामध्ये 3181 मते पोस्टल मतदानाचा समावेश आहे. दरम्यान 34 डॉक्टरांनी निवडणूक लढवली यामध्ये 6 जणांना यश मिळाले असून यामध्ये श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.