Wednesday 7 June 2017

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी, मतमोजणी २० जुलैला ; Presidential election on July 17, counting on July 20

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी, मतमोजणी २० जुलैला

राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही


देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने आज जाहीर केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 जुलै रोजी होणार आहे. 

राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची तारिख 14 जून आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जून असेल. 29 जून रोजी आलेल्या अर्जाची पडताळणी करण्याच येईल. अर्ज माघारी घेण्याची मुदत 1 जुलै असेल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले. 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले. 24 जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वीच भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीपतीची निवड होणार आहे. 

भारताचे सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर, ही निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी खासदारांनी संसदेमध्ये; तर आमदारांनी त्यांच्या राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. याशिवाय, आणीबाणीची परिस्थिती उद्‌भविल्यास त्यांना 10 दिवसांची नोटिसही देता येईल तसेच 10 दिवसांची नोटिस दिल्यास कोणत्याही राज्यातील आमदारास दिल्लीमध्येही मतदान करता येणार आहे. या निवडणुकीनंतरची मतमोजणी अर्थातच राजधानीमध्ये केली जाईल.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत 776 खासदार व सर्व राज्यांतील मिळून 4120 आमदार मतदान करणार आहेत. आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य 10,98,882 इतके आहे. देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज 5 लाख 49 हजार 474 इतकी आहे. तर 776 खासदारांच्या मतमूल्याची बेरीज 5 लाख 49 हजार 408 आहे. राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान 5 लाख 49 हजार 441 मतांची आवश्यकता आहे.

-----------------------------------------------------------------------------
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया :
– उमेदवाराच्या अर्जावर ५० प्रस्तावक, ५० अनुमोदक असणं गरजेचं.
– उमेदवाराला निवडणुकीसाठी १५ हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार.
– संसद, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुडुच्चेरी या केंद्रशासित राज्यांच्या विधानसभा या ठिकाणी मतदान होणार
– गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.
– निवडणूक आयोगानं दिलेल्या विशेष पेनानंच मतदान केलं जाईल.
– यात मतदारांना पसंती क्रम द्यायचे असतात ( १ ते… जितके उमेदवार)
– राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी कुठलाही व्हिप जारी करू शकत नाही.
– लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल हे संसदेच्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी

असा असेल राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम:
– निवडणुकीची अधिसूचना १४ जून रोजी काढण्यात येईल.
– अर्ज करण्यासाठी शेवटी तारीख २८ जून असणार आहे.
– उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी २९ जूनला होईल.  
– १ जुलै अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल.
– मतदानाची गरज पडली तर १७ जुलैला मतदान होईल.
– मतमोजणी २० जुलैला होईल.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?
लोकसभेतले 543
राज्यसभेतले 233
असे एकूण 776 खासदार मतदान करतात
प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागिले 776 असे करुन हा आकडा काढला जातो)
देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4120
म्हणजे 776 खासदार अधिक 4120 आमदार  = 4896 जणांचं निर्वाचक मंडळ ( electoral college)
…………….
आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते
उदा. महाराष्ट्र
महाराष्ट्राची 1971 मधली लोकसंख्या : 5,04,12,235
5,04,12,235 (पाच कोटी 4 लाख)
भागिले
288
याचं उत्तर येतं 1,75,042
( 288 नं भागण्याचं कारण विधानपरिषदेचे आमदार या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत)
एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042
त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175  ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत
यात 1971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे

…………….
यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे
…………….
राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882
( यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474)
…………….
बहुमतासाठी आकडा : 5,49,442
…………….
पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती
पाच राज्यातल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे
शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनचा आहे
शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868
अधिक
63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025
अशी एकूण साधारण 25 हजार मतं आहेत
शिवसेना सोबत आली नाही तर एनडीएला कमी पडणाऱ्या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहचतात
…………….
ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील
…………
बीजेडी सोबत आल्यास काय?
बीजेडी कडे 20 लोकसभा अधिक सात राज्यसभा असे एकूण 27 खासदार
27 गुणिले 708 म्हणजे 19,116 इतकी खासदारांची मतं
तर 117 आमदार आहेत
एका आमदाराच्या मताची किंमत ओडिशात 149 आहे
117 गुणिले 149 म्हणजे 17,433 इतकी आमदारांची मतं आहेत.
दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते
……………
एआयडीएमके सोबत आल्यास काय?
एआयडीएमकेकडे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 असे एकूण 50 खासदार आहेत
म्हणजे 50 गुणिले 708 म्हणजे 35 हजार 400 इतकी खासदारांची मतं आहेत
तर एआयडीएमकेकडे 134 आमदार आहेत
तामिळनाडूत एका आमदाराच्या मताची किंमत 176 आहे
134 गुणिले 176 म्हणजे 23,584 इतकी आमदारांची मतं आहेत
दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल.

एनडीएला अजूनही मतं कमी असल्यानं शिवसेनेचा भाव टिकून आहे.
......... Political Research and Analysis Bureau (PRAB)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.