Friday 1 June 2018

लोकसभेत 4 वर्षांत 282 वरून भाजप 272 वर; मतांची टक्केवारीही घसरली ; पालघरमध्ये शिवसेनेचा पराभव; भंडारा-गोंदियात राष्‍ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

लोकसभेत 4 वर्षांत 282 वरून भाजप 272 वर

भाजपच्या मतांची टक्केवारीही घसरली

देशातील चार लोकसभा आणि दहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल भाजपला हादरवणारे आहेत. २०१४मधील लोकसभा निवडणुकांनंतर २७ लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका झाल्या आहेत . त्यामध्ये भाजपने २४ मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यामध्ये भाजपला केवळ पाच जागाच जिंकता आल्या आहेत. उर्वरित जागा विरोधकांनी जिंकल्या आहेत. ही बाब भाजपसाठी निश्चितच चिंताजनक आहे. भाजपनं केवळ जागाच गमावल्या नाहीत, तर मतांची टक्केवारीही घसरली आहे. २०१४ मध्ये लोकसभेच्या कैराना मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजप खासदार हुकूमसिंह यांना ५०.६ टक्के मते मिळाली होती. त्यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपच्या मृगांका सिंह यांना रालोदच्या तबस्सुम यांनी पराभूत केलं. भाजपनं गेल्या वेळी मिळवलेली मते राखली असती तरी भाजपचा विजय निश्चित होता. मात्र, गोरखपूर आणि फुलपूरनंतर येथेही भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र आले आणि भाजपचा पराभव झाला. भाजपला केवळ ४६.५ टक्के मते मिळाली. महाराष्ट्रातील पालघर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघांमध्येही भाजपला फटका बसला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पालघरमध्ये ९ टक्के आणि भंडारा-गोंदियात २३ टक्के मते कमी मिळाली. विशेष म्हणजे २०१४मध्ये भाजपसोबत शिवसेना होती. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीच्या तुलनेत गोंदियात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची टक्केवारी ८ टक्क्यांनी वाढली आहे. नागालॅण्ड लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक अलायन्स (पीडीए)चे उमेदवार तोखेहो येपथोमी यांनी विजय मिळवला. त्यांना २, १५, ८३५ मते मिळाली. तर नागा पीपल्स फ्रंटचे के. सी. अपोक जामिर यांना १, ७३, ८६३ मते मिळाली आहेत.
विधानसभा पोटनिवडणुकांतही भाजपला धक्का
१० विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण केलं तर बहुतांश ठिकाणी भाजपच्या मतांची टक्केवारी घसरली आहे. पण पश्चिम बंगालमधील महेशतला विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवानंतरही भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. महेशतलामध्ये तृणमूलच्या दुलाल दास यांनी विजय मिळवला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या मोठ्या राज्यांशिवाय केरळमधील पोटनिवडणुकांचे निकालही भाजपला धोक्याचा इशारा देणारे आहेत. चेंगनूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला यावेळी २३.२ टक्के मते मिळाली. पण २०१६ मध्ये २९.३ टक्के मते मिळाली होती.

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले, तर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले. दोनही जागांवर पूर्वी भाजपचे वर्चस्व होते.
कर्नाटक : कर्नाटकातील आरआर नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मुनीराथन यांनी भाजपला पराभूत करून ४० हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
पंजाब : पंजाबच्या शाहकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला मागे टाकत काँग्रेस विजयी. शाहकोटमधून काँग्रेसचे हरदेव सिंह यांचा ३८ हजार मतांनी विजय
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या महेस्थला विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विजयी. टीएमसीच्या उमेदवार चंद्रा दास विजयी
उत्तराखंड : उत्तराखंडच्या थराली विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ भाजपच्या उमेदवार मुन्नी देवी विजयी.
मेघालय : मेघालयच्या अंपती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मियानी डी शेरा विजयी झाल्या आहेत.
बिहार : बिहारच्या जोकीहाट विधानसभा मतदारसंघात भाजप-जेडीयु या युतीला मागे टाकत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विजयी.
केरळ : केरळमधील चेंगनुर विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ पक्ष मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे उमेदवार विजयी.
झारखंड : झारखंडमधील गोमिया व सिल्ली विधानसभा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे दोनही उमेदवार विजयी.
नागालँड : नागालँडच्या एकमेव लोकसभा मतदारसंघात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे टोकेहो विजयी.


भाजपच्या लोकसभेच्या आणखी 2 जागा कमी,

 4 वर्षांत 282 वरून 272 वर

११ राज्यांत लोकसभेच्या ४ आणि विधानसभेच्या १० जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. एकजूट झालेल्या विरोधी पक्षाने १४ पैकी ११ जागांवर विजय मिळवत भाजपला चांगलाच झटका दिला. भाजपने आपल्या लोकसभेच्या आणखी दोन जागा- यूपीतील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया गमावल्या. २०१४ मध्ये २८२ खासदारांसह लोकसभेत पोहोचलेल्या भाजपकडे आता लोकसभा अध्यक्षासह २७२ खासदारच उरले आहेत. लोकसभेत बहुमताचा आकडाही बरोबर २७२ इतकाच आहे. गेल्या ४ वर्षांत लोकसभेच्या २७ पोटनिवडणुकांत भाजप फक्त पाचच जागा जिंकू शकली आहे. पक्षाचा तब्बल ८ जागी पराभव झालेला आहे. नुकतेच पक्षाचे खासदार बी.एस. येदियुरप्पा आणि श्रीरामुलू यांनीही राजीनामा दिलेला आहे. सध्या लोकसभेच्या ४ जागा रिक्त आहेत.

यूपीत पुन्हा विरोधकांच्या एकजुटीचा विजय

यूपीच्या कैरानात ५ पक्षांच्या पाठिंब्याने रालोदच्या तबस्सुम हसन यांनी भाजपच्या मृगांका सिंह यांना ४४,६१८ मतांनी हरवले. भाजपचे हुकुमसिंह यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यूपीत गोरखपूर-फुलपूर पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकजूट विरोधी पक्षाने भाजपवर मात केली.नागालँडच्या एकमेव लोकसभा जागेवर भाजपचा मित्रपक्ष एनडीपीपीचे तोखेहो येपथेमी सुमारे पावणेदोन लाख मतांनी विजयी झाले.यूपीतील नूरपूर विधानसभा जागेवर सपाने भाजपला धूळ चारली. उत्तराखंडातील थराली जागा भाजपने राखली. काँग्रेसने मेघालय, कर्नाटक व पंजाबच्या तिन्ही जागा जिंकल्या. झारखंडमध्ये झामुमोने २ व माकपने केरळ, राजदने बिहार, तृणमूलने प. बंगालमध्ये प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. 2014 मध्ये नरेंद्र मोदींना केंद्रात पूर्ण बहुमत मिळवून देण्यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. त्यावेळी भाजपानं उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता उत्तर प्रदेशातील स्थिती भाजपासाठी अनुकूल राहिलेली नाही. 2014 मध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला उत्तर प्रदेशात 43 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला झालेल्या मतदानाची बेरीज 42 टक्के होते. याशिवाय काँग्रेसला 12 टक्के तर अन्य पक्षांना 7 टक्के मतं मिळाली होती.  सध्याचा मतदानाचा कल पाहता एनडीएला 35 टक्के मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मिळून 46 टक्के मतं मिळाली आहेत. यामध्ये काँग्रेसच्या 12 टक्के आणि इतर पक्षांच्या 3 टक्के मतांची भर पडल्यास हा आकडा थेट 60 टक्क्यांवर जातो. गेल्या चार वर्षांमधील आकडेवारी पाहिल्यास, भाजपाच्या मतांमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र याचवेळी विरोधक एकत्र येत असल्यानं त्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे आज लोकसभेची निवडणूक झाल्यास आणि उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र लढल्यास भाजपाला 80 पैकी फक्त 19 जागांवर यश मिळेल आणि विरोधी पक्ष तब्बल 61 जागांवर विजयी होतील असा अंदाज नुकताच वर्तविला आहे.

जागा घटूनही भाजपचे स्वबळावर बहुमत कायम

५४३ सदस्यांच्या लोकसभेत ४ जागा रिक्त आहेत. म्हणजेच संसदेत आता ५३९ खासदार आहेत. यामुळे बहुमताचा आकडा २७० असेल. भाजपकडे २७२ खासदार आहेत. त्यांचे स्वबळावरील बहुमत कायम आहे. २ नामनिर्देशित सदस्यांसह भाजपकडे एकूण २७४, तर एनडीएकडे ३१५ सदस्य आहेत.

पालघरमध्ये शिवसेनेचा पराभव

पालघर लोकसभा मतदारसंघात "पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो" (प्राब) संस्थेने या मतदारसंघात मतदानोत्तर चाचणी घेतली होती. यामध्ये मतदारांनी भाजपलाच सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. तर त्याखालोखाल बहुजन विकास आघाडी व शिवसेनेला पसंती दिल्याचे दिसून आले होते तसेच राजकीय पक्षांना मतदारांची पसंतीचे प्रमाण विषद करण्यात आले होते सदरील पसंती प्रमाणाचा अंदाज मतदानोत्तर चाचणीद्वारे वर्तविण्यात आला होता त्या तंतोतंत अंदाजावर निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे.



राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूक 2018 चा निकाल जाहीर झाला. भाजपचे राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत 29 हजार 572 मतांनी विजय मिळवला. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला.राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे 2 लाख 43 हजार 210 मतं मिळाली.बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनीही 2 लाख 22 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किरण गहला यांना जवळपास 71 हजार मतं मिळाली.काँग्रेसला या निवडणुकीत मोठी मजल मारता आली नाही. काँग्रेसचा उमेदवार दामोदर शिंगडा हे पाचव्या क्रमांकावर राहिले.भाजपचे खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली.चिंतमन वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचे आरोप झाले.मूळचे काँग्रेसचे असलेले राजेंद्र गावित हे या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास अगोदर भाजपमध्ये आले होते.

पालघरमध्ये गणिते बदलली 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने वसई आणि नालासोपारा विधानसभा वगळता जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांची गणिते भारतीय जनता पक्षाने बदलून टाकली आहेत. पालघर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तिथेही भाजपने आघाडी घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिथे 97 हजार मते घेणार्‍या बविआला या लोकसभा पोटनिवडणुकीत याच ठिकाणी 64 हजार 478 मते पडली. बविआची अशीच अवस्था नालासोपारा या विधानसभा मतदारसंघातही  झाली. या दोन विधानसभा मतदारसंघांच्या भरवशावर असलेल्या बविआने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.नालासोपारा विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे बविआचे वर्चस्व राहिले. येथे बळीराम जाधव यांना 79 हजार 134 मते मिळाली. ही मते शिवसेना (27,265), भाजप (37,623), काँग्रेस (3,662), माकप (786), मार्क्ससिस्ट लेनिनिस्ट (306), संदीप जाधव (अपक्ष - 306) यांच्या एकत्रित मतांपेक्षाही अधिक आहेत. बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आपली मते वाढवून बविआचे आमदार विलास तरे यांना इशारा आहे. सेनेने 49 हजार 991 मते मिळवत आपला वरचष्मा प्रस्थापित केला. पालघर जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात लक्षणीय लढत डहाणू विधानसभा मतदारसंघात होती. येथून सेनेला म्हणजेच श्रीनिवास वनगा यांना सहानुभूतीची मते जास्त मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र येथे भाजपाने सर्वाधिक 48 हजार 531 मते मिळवली, तर सेनेला 38 हजार 186 मते मिळाली. सेनेला सहानुभूतीची मते नक्की मिळाली मात्र ती भाजपाला मागे पाडू  शकली नाही, हे विशेष. याठिकाणी राष्ट्रवादीने भाजपाला छुपी मदतही केल्याचे बोलले जात आहे. विक्रमगड विधानसभेत भाजपा आणि सेना दोन्ही पक्षांच्या मतांत वाढ झाली. भाजपाला येथे सर्वाधिक 56 हजार 578 मते मिळाली. 51 हजार 164 मते सेनेला मिळाली. म्हणजे डहाणू आणि विक्रमगडने भाजपाला खर्‍या अर्थाने तारले, तर वसई पालघरने भाजपच्या मताधिक्यात भर टाकल्याने  भाजपाचा विजय निश्चित झाला.
लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय झालेली मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच पक्षांनी आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.
डहाणू विधानसभा मतदारसंघ
डहाणू विधानसभा मतदार संघातून भाजपाचे पास्कल धनारे हे आमदार आहेत. येथून राजेंद्र गावीत यांना ४९ हजार १८१, किरण गहला यांना ४२ हजार ५१७, श्रीनिवास वनगा यांना ३८ हजार ७७८, दामू शिंगडा यांना ५ हजार ९५५, बळीराम जाधव यांना ५ हजार ४८४, शंकर भदादे यांना १ हजार ६ तर संदीप जाधव यांना १ हजार ७२९ मते मिळाली असून ४ हजार ४४६१ मतदारांनी नोटा (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले.असे मिळून डहाणू विधानसभा मतदार संघात १ लाख ४९ हजार २११मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघ
विक्रमगड विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विष्णू सवरा हे आमदार आहेत. येथून राजेंद्र गावीत यांना ५६ हजार ५१८, श्रीनिवास वनगा यांना ५१ हजार १६४, किरण गहला यांना १६ हजार १०९, बळीराम जाधव यांना १३ हजार २९७, दामू शिंगडा १२ हजार ७४७, संदीप जाधव यांना १ हजार ९१८, शंकर भदादे १ हजार ५०१ मते मिळाली असून ४ हजार ५३ मतदारांनी नोटा ला मतदान केले.असे मिळून विक्र मगड विधानसभा मतदार संघात १ लाख ५७ हजार ३०७ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले
पालघर विधानसभा मतदारसंघ
पालघर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे अमित घोडा हे आमदार आहेत. त्या मतदारसंघातून राजेंद्र गावीत यांना ५६ हजार २१३, श्रीनिवास वनगा यांना ५४ हजार ४५३, बळीराम जाधव यांना १३ हजार ६९०, दामू शिंगडा यांना ८ हजार ७३६ किरण गहला यांना ६ हजार ५९१, संदीप जाधव यांना १ हजार ३३७, शंकर भदादे यांना ८०९ मते मिळाली असून ३ हजार ७४ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले. असे मिळून पालघर विधानसभा मतदार संघात १ लाख ४४ हजार ९०५ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
बोईसर विधानसभा मतदारसंघ
बोईसर विधानसभा मतदार संघात बविआचे विलास तरे हे आमदार आहेत. येथून श्रीनिवास वनगा यांना ४९ हजार ९९१, बळीराम जाधव यांना ४ हजार ७५४, राजेंद्र गावीत यांना ४१ हजार ६३२, किरण गहला यांना ४ हजार ९६०, दामू शिंगडा यांना ४ हजार ३७४, संदीप जाधव यांना १ हजार ७२ तर शंकर भदादे यांना ८१४ मते मिळाली असून २ हजार २२६ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले, असे मिळून बोईसर विधानसभा मतदार संघात १ लाख ५१ हजार ८२३ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
नालासोपारा विधानसभा मतदारसंघ
नालासोपारा विधानसभा मतदार संघात बविआचे क्षितिज ठाकूर हे आमदार आहेत. येथून बळीराम जाधव यांना ७९ हजार १३४, राजेंद्र गावीत यांना ३७ हजार ६२३, श्रीनिवास वनगा यांना २७ हजार २६५, दामू शिंगडा यांना ३ हजार ६६२, किरण गहला यांना ७८६, शंकर भदादे यांना ३०६ तर संदीप जाधव यांना २७४ मते मिळाली असून १ हजार ४०६ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले, असे मिळून नालासोपारा विधानसभा मतदार संघात १ लाख ५० हजार ४५६मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
वसई विधानसभा मतदारसंघ
वसई विधानसभा मतदारसंघात बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत. तेथून बळीराम जाधव यांना ६४ हजार ४७८, राजेंद्र गावीत यांना ३१ हजार ६११, श्रीनिवास वनगा यांना २१ हजार ५५५, दामू शिंगडा यांना १२ हजार २३९, किरण गहला यांना ९२४, शंकर भदादे यांना ३४८ तर संदीप जाधव यांना ३३९ मते मिळाली असून १ हजार ६६४ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले. असे मिळून वसई विधानसभा मतदार संघात १ लाख ३३ हजार १५८ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
वरील आकडेवारी पाहता बोईसर विधानसभा मतदारसंघात बविआच्या उमेदवारापेक्षा शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा व भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पडलेली अधिक मते वगळता जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून पक्षिय बलाबल पूर्वी सारखेच राहिले आहे.

भंडारा-गोंदियात राष्‍ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी



लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसने भाजपचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. राष्‍ट्रवादीचे मधुकरराव कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांच्यावर ४८ हजार ९७ मतांनी विजय मिळविला. हेमंत पटलेंना ३ लाख ८६ हजार मते मिळाली.नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे  जागा रिक्‍त झाली होती.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.