Wednesday, 28 January 2026

अजित दादांच्या अकाली दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला; जिल्हा परिषदा निवडणुकां पुढे ढकलण्याची शक्यता!

निवडणुकांवर दुख:चे सावट; सर्व पक्षांकडून प्रचार स्थगित 


बारामतीजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 2026 च्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. अजित दादांच्या अकाली दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वच सुन्न झाले असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून नेतृत्व हरपल्याने पोरके झाल्याची भावना निर्माण झालेली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आजपासून सुरु होणार होता मात्र या दुर्घटनेमुळे निवडणुकांवर दुख:चे सावट असून प्रक्रियेतील सहभागाचा विचार करु शकत नाहीत. सर्व राजकीय पक्षांकडून प्रचार स्थगित करण्यात आलेला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हा परिषदा निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झालेली असून याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. 


वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव हे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख विदीप जाधव (PSO),पिंकी माळी आणि सुमित कपूर अशी करण्यात आली आहे. विमानाचे वैमानिक कॅप्टन साहिल मदन (पायलट-इन-कमांड) आणि फर्स्ट ऑफिसर हे होते. मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे कॉन्स्टेबल विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव हे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी होते. जाधव हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर तसेच सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. 

पिंकी माळी कोण आहेत? 

पिंकी माळी ही शिवकुमार माळी यांची मुलगी होती. ती अपघातावेळी अजितदादांसोबत विमानात उपस्थित होती. क्रु मेंमर म्हणून ती कार्यरत होती.  गेल्या ५ वर्षापासून पिंकी माळी क्रु मेंमर म्हणून काम करत होती. याआधी अजित पवारांसोब ३ वेळा प्रवास केला होता. पिंकी माळी ही प्रायव्हेट विमानामध्ये नेहमी राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यासोबत क्रु मेंमर म्हणून प्रवास करायची..पिंकी माळीचे पालक झाले भावूकपिंकी माळीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ' पहाटे अजितपवारांसोबत बारामतीला जाणार असल्याचं तिने रात्री मला फोनवर सांगितलं. तेच शेवटचं बोलणं झालं.' तिने याआधी तीन वेळा अजितदादांसोबत विमानात प्रवास केला होता.

उमद्या नेत्याच्या अकाली मृत्यूने राज्याच्या राजकारणात असंख्य प्रश्न निर्माण

अजित अनंतराव पवार हे नाव राज्याच्या राजकारणात जवळपास चार दशकांहून अधिक काळ केंद्रस्थानी राहिले. सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून १९८२ मध्ये त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. राज्यात विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. मात्र या उमद्या नेत्याच्या, विमान अपघातातील अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकीकरण, पक्षाचे नेतृत्व असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काम होत असेल तर हो सांगून, तडक कार्यकर्त्याचे काम जागेवर करणार, अन्यथा स्पष्टपणे नमूद करणार हा अजित पवार यांचा कामाचा खाक्या. पहाटे सहा वाजल्यापासून अधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी हे नित्याचे. अनेक वेळा सामान्य नागरिक राजकारण्यांना दूषणे देतो, मात्र या व्यक्ती किती तास काम करतात, समाजासाठी किती वेळ देतात याचा विचार करत नाही. पुणे  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद १९९१ मध्ये त्यांच्याकडे आले. पुढे सोळा वर्षे या पदावर ते होते. लोकसभेवर १९९१ मध्ये बारामती या पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून विजयी झाले. पुढच्याच वर्षी राज्य मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली. बारामतीमधून सात वेळा चढत्या मताधिक्याने ते विधानसभेवर गेले. सभोवती कार्यकर्त्यांची वर्दळ, बोलण्यात हजरजबाबीपणा यामुळे राज्याच्या राजकारणात विशेषत: ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता कायम राहिली. मोठे संघटन उभे करूनही मुख्यमंत्रीपद हुकल्याची हुरहूर त्यांच्या समर्थकांत आहे. अजितदादांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या समवेत राजकीय क्षेत्रात काम केले. मात्र २३ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी बंड करत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हे अल्पकाळ टिकले. ते पुन्हा स्वगृही परतले. मात्र पुन्हा २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडत सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यांच्याबरोबर बहुसंख्य आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. अजित पवार भाजपबरोबर गेल्याने त्यांच्यावर टीका झाली. हा वैचारिक संघर्ष होता. मात्र सत्तेबरोबर राहिल्याने मतदार संघातील तसेच कार्यकर्त्यांची कामे होतात. अशी धारणा त्यांच्याबरोबर गेलेल्या अनेकांची होती. विचारांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन महत्त्वाचा हेच सूत्र यातून पुढे आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला. सुनिल तटकरे यांच्या रूपाने त्यांचा एकमेव खासदार विजयी झाला. दादांच्या पत्नी सुनेत्राताई बारामतीमधून लोकसभेला सुप्रिया पवार यांच्याविरोधात पराभूत झाल्या. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षात हा त्यांना धक्का होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांनी भरपाई करत राज्यात तिसऱ्या क्रमांकाच्या जागा निवडून आणल्या. भाजपशी संघर्ष करून लाभ नाही हे जाणून, समन्वयाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ठेवली. अर्थात वैचारिक तडजोड केली जाणार नाही हे देखील नमूद केले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर फारसा परिणाम झाला नाही. विधासभेला बारामतीमधून विक्रमी मताधिक्य घेत मतदारसंघावरील पकड सिद्ध केली. विधानसभेला शदर पवार गटाची कामगिरी खराब झाली. महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. विरोधाची धार कमी झाली. त्यातूनच पुढे नगरपालिकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अनेक ठिकाणी आघाडी झाली. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. आता अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर विलीनीकरण आणि नेतृत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. राज्यात अजितदादांच्या पश्चात पक्षाचे नेतृत्व कोणाकडे या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढचे काही महिने महत्त्वाचे ठरतील. यात भाजपची भूमिका निर्णायक ठरेल. एका उमद्या नेत्याच्या अकाली मृत्यूने राज्याच्या राजकारणात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. 

======

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.