Thursday 9 June 2022

विधानपरिषद निवडणूक-2022; शिवसेना उमेदवाराकडून प्रतिज्ञापत्रात दोन्ही पत्नींना स्थान

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी राजकीय पक्षांकडून 12 उमेदवारांना उमेदवारी; चुरशीची लढत

लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या एकापेक्षा जास्त बायकांचा विषय राज्यातील राजकारणात नवीन नाही मात्र पहिली पत्नी असूनही दुसरी केल्यावर निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दोन्ही पत्नींना स्थान शक्यतो दिले जात नाही मात्र शिवसेना उमेदवार याला अपवाद ठरले आहेत. शिवसेनेचे विधानपरिषद निवडणुकीसाठीचे दुसरे उमेदवार व नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. आमश्या पाडवी (Aamshya Padvi)  यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन्ही पत्नींना स्थान दिलेले आहे. दोन्ही पत्नींचा मालमत्ता तपशील त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी नेतृत्व शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी राजकारणात कार्यरत आहेत. त्यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र, प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यामध्ये  अवलंबून असणारी व्यक्ती मध्ये पहिली पत्नी सौ. जवराबाई आमश्या पाडवी असे नाव नमूद केले आहे तर दुसरी अवलंबून असणारी व्यक्ती म्हणून दुसरी पत्नी सौ. रेखाबाई आमश्या पाडवी यांचे नाव व तपशील नमूद केलेला आहे तर तिसरी अवलंबून असणारी व्यक्ती म्हणून मुलगी कु. लक्ष्मी आमश्या पाडवी असे नाव व तपशील नमूद केलेला आहे. वास्तविकपणे त्यांना 2 बायका आणि 4 मुले आहेत त्यामध्ये 1 मुलगा आणि 3 मुली आहेत. श्री. आमश्या पाडवी (Aamshya Padvi)  यांनी सन 2014 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुक शिवसेनेतर्फे लढवली त्यावेळी देखील दाखल प्रतिज्ञापत्रात दोन्हीही पत्नी व 4 मुलांचा तपशील नमूद केलेला होता. तर सन 2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुक शिवसेनेतर्फे त्यांचा मुलगा श्री. शंकर आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी देखील दाखल प्रतिज्ञापत्रात दोन्हीही आई व पत्नी, मुले, बहिणींचा तपशील नमूद केलेला होता. 

तत्कालीन भाजप आमदाराकडून असाही न्याय- एकावेळी पाहिल्या तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या पत्नीला प्रतिज्ञापत्रात स्थान!

सन 2014 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये यवतमाळमधील आर्णी-केळापूरचे भाजपचे विजयी उमेदवार  राजू तोडसाम यांनी पहिल्या पत्नी सौ.अर्चना राजू तोडसाम (पॅन क्र. AARPY4789K ) यांचा तपशील नमूद केलेला होता. मात्र सन 2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या पत्नीचे नाव वगळून दुसऱ्या पत्नी सौ. प्रिया (पॅन क्र. CMRPS3514A ) यांचा तपशील नमूद केलेला होता. त्यावेळी भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तत्कालीन भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या (11 फेब्रुवारीला 2019) वाढदिवसानिमित्त पांढरकवडा इथल्या वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भर कार्यक्रमात हाणामारी झाली होती त्यामुळे ते चर्चेत आले होते. 

दुसरी पत्नी: दुसऱ्या लग्नाची कायदेशीरता- 

-हिंदू विवाह कायदा, १९५५ चे कलम ५ हे, ‘लग्नाच्या वेळी दोघांपैकी कोणाचाही जोडीदार हयात नाही’ या आधारे या विवाहाला कायदेशीर पावित्र्य प्रदान करण्याच्या अनेक अटींपैकी एक आहे.
-जर पहिला विवाह अस्तित्वात असताना पतीने दुसरा विवाह केला, तर हिंदू कायदा दुसऱ्या लग्नाच्या वेळी पहिल्या विवाहाला ‘निर्वाह (साब्सिस्टंस)’ म्हणून संबोधतो. म्हणजे दुसऱ्या लग्नानंतरही पती पहिल्या पत्नीशी विवाहित राहतो.
-हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम ५ नुसार, एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीशी विवाह केला असेल तर तो अवैध आहे. याचा अर्थ, या प्रकरणात दुसरी पत्नी आणि पती यांच्यातील दुसरा विवाह रद्दबातल ठरतो.

10 जागांसाठी राजकीय पक्षांकडून 12 उमेदवारांना उमेदवारी

विधान परिषद निवडणुकीत 10 जागांसाठी राजकीय पक्षांकडून 12 उमेदवारांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी नाकारल्याने भाजप पक्षामध्ये नाराजीचे वातावरण टाळून उत्साह निर्माण करून विरोधकांमधील राजकीयदृष्ट्या संशयकल्लोळचा लाभ घेण्यासाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून नामी शक्कल भाजपने लढवली आहे. वास्तविकपणे संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार विधानपरिषदेवर आरामात निवडून येवू शकतात तर दुसऱ्या उमेदवाराला अपक्ष व अन्य लहान पक्षांच्या सदस्यांवर अवलंबून 5 वी जागा जिंकण्याचे आव्हान असताना भाजपने 6 व्या जागेसाठी पुरस्कृत उमेदवार जाहीर करून निवडणुकीत रंगत आणली आहे. सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊंच्या नावाची घोषणा सहावे उमेदवार म्हणून केली आहे. विधान परिषदेसाठी आता 10 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. यात महाविकास आघाडीकडून सहा तर भाजपकडून सहा उमेदवार आता रणांगणात आहेत. महाविकास आघाडीचे सहा (शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2) भाजपचे सहा उमेदवार आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून मुंबईकर भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत तर राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तसेच भाजपकडून प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत (पुरस्कृत) यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी देखील  अर्ज दाखल केले आहेत. तसेच प्रतिज्ञापत्रात भाजप पक्षाचे नाव नमूद करून विशाल उद्धव नांदरकर या अपक्ष उमेदवाराने देखील नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारास 4 हजार 200 मते आवश्यक आहेत. पण, सध्या 500 मतांचे मूल्य असलेल्या 5 लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयीच अनिश्चितता असल्याने भाजप आणि मविआ या दोन्ही बाजूकडे चिंता आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना 10 जून रोजी राज्यसभेच्या मतदानासाठी विमानाने मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. 

नवाब मलिक, अनिल देशमुखांचा मतदानाचा अर्ज कोर्टाने फेटाळला, उच्च न्यायालयात दाद

राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने गुरुवारी या संदर्भात निर्णय देत मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी हे मतदान केले नाही, तर ते आपल्या कर्तव्यापासून वंचित राहतील. त्यामुळे जनतेच्या मताचाही अनादर होईल, असा युक्तिवाद देशमुख-मलिक यांच्यातर्फे एक दिवसाच्या जामिनाची मागणी करताना केला होता. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या वकिलाने आदेशाची प्रमाणित प्रत लवकरात लवकर देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून त्यांना आज उच्च न्यायालयात जाता येईल. देशमुख आणि मलिक यांनी केलेल्या अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर बुधवारी दिवसभर सुनावणी झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही या आपल्या दाव्याचा अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी पुनरुच्चार केला होता. मतदान करणे हा मूलभूत अधिकार नसून वैधानिक अधिकार आहे, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. तसेच एखाद्याला दोषी ठरवण्यात आले असले किंवा तो कच्चा कैदी असला तरी त्याला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येऊ शकत नसल्याचा दावाही ईडीतर्फे करण्यात आला होता. तसेच देशमुख आणि मलिक यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता विशेष न्यायालयाने निर्णय देत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

विजयासाठी हवी 27 मते

विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात. भाजपचे 106, आघाडीचे 152, अपक्ष 13 आणि छोटे पक्ष 16 असे 287 आमदार विधानसभेत आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास विजयासाठी 27 मते आवश्यक आहेत. मतदान गुप्त पद्धतीने आहे. भाजपने 5 वा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यापैकी एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.

विधान परिषद निवडणूक-2022 मधील उमेदवार खालीलप्रमाणे-

शिवसेना उमेदवार
सचिन अहिर (Sachin Ahir)
आमश्या पाडवी (Aamshya Padvi)
काँग्रेस उमेदवार
भाई जगताप (Bhai Jagtap)
चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)
भाजप उमेदवार
प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
उमा खापरे (Uma Khapre)
श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy)
राम शिंदे (Ram Shinde)
प्रसाद लाड (Prasad Lad)
सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot)
राष्ट्रवादी उमेदवार
एकनाथ खडसे (Eknath Khadse)
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.