Tuesday 21 June 2022

मतांची फाटाफूट; शिवसेनेत बंड; महाविकास आघाडी सरकार धोक्यात!

बंडखोरांच्या जिवावर सरकार स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न! 

राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेनेसह आघाडीतील घटकपक्षांच्या मतांची फाटाफूट होऊन पाचवा उमेदवार जिंकल्याने भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. शिवसेना नेते व मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत नाराजीचा बांध फुटून 20 हून अधिक नाराज आमदारांना सुरतेकडे रवाना होऊन बंड केले आहे. भल्या पहाटेचे फसलेले बंडाच्या पार्श्वभूमीवर भाजपने यावेळी चांगली तयारी केली असून बंडखोरांच्या जिवावर राज्यात सरकार स्थापन करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना वेग आलेला आहे. महाराष्ट्रासह गुजरातमधील सुरत, अहमदाबाद आणि दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मध्येही काही आमदार पक्षांतर्गत नाराजी असून सर्व काही अलबेल नाही. मतांची फाटाफूट झाल्याने कॉंग्रेस मध्ये पक्षांतर्गत गटबाजीत नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करण्यास भाजपला यश आले आहे मात्र सरकार स्थापन करण्याची भाजप अतिघाई करीत आहे याचा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसेल काय? आणि त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसतील काय? यावर देखील खल केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार आपोआप कोसळेल असे वक्तव्य करणारे भाजपचे नेतेच सरकार पाडण्यासाठी सर्व तऱ्हेने प्रयत्नशील आहेत असा संदेश सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोहोचला जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व कॉंग्रेस पक्षातील नेत्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रभाव सत्तेत असल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्ते नेत्यांना झुकते माप दिले जात असल्याच्या सर्वाधिक तक्रारी अन्य घटक पक्षांच्या होत्या. राष्ट्रवादी-कॉंग्रेस विरोधात लढून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आल्याने बहुतांश मतदारसंघात शिवसेनेच्या नेत्यांची, खासदार-आमदारांची स्थानिक पातळीवर कोंडी निर्माण झाली होती. शिवसेनेच्या निवडणूक आलेल्या 35 आमदारांच्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष असल्याने आगामी काळात स्थानिक पातळीवर निवडणुकांना सामोरे जाताना राजकीय पेच निर्माण होत असल्याने तसेच भाजप युती शिवाय पुढील निवडणुका जिंकणे सोयीचे नाही या भावनेने बहुतांश असे आमदार महाविकास आघाडी सरकार प्रयोगावर नाराज होते. या नाराजीचा बांध राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीतील घडामोडींमुळे फोडण्यास कारणीभूत ठरलेला आहे याची परिणीती आजच्या राजकीय बंडाळीतून दिसून येत आहे. या राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपने का घेवू नये असाही कल व्यक्त केला जात आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाल्याने राष्ट्रवादीने पाच अतिरिक्त मतांची बेगमी केली. शिवसेनेचे संख्याबळ ५५ असून, तीन अपक्ष मंत्री व अन्य काही आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेला ६० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मतेच मिळाली. शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५५ असल्याने तीन मते फुटल्याचे स्पष्टच दिसते. मात्र शिवसेनेबरोबर असलेल्या सहयोगी आमदारांनी मते दिली असे गृहित धरल्यास शिवसेनेची अधिक मते फुटली आहेत हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी मतांची फाटाफूट झाल्याने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेवर नामुष्की ओढवली आहे त्यामुळेच बंडखोरीचा उगम या निवडणुकीत झाला आहे. भाजपाचे १०६  आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपाला ११ मते अधिक मिळाली आहेत. शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपाला यश आले आहे. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले. राज्यसभेपूर्वी मविआकडे १७० संख्याबळ होते. राज्यसभा निवडणुकीत ते दहाने घटले आणि विधान परिषदेत एकूण १९ मते कमी झाली. तर, भाजपचे संख्याबळ १३४ वर पोहोचले आहे. हेच गणित गृहीत धरले तर सरकार टिकण्यासाठी बहुमताचा आकडा १४३ वर येतो. मविआ आणि भाजपमधील संख्याबळात अत्यल्प अंतर राहिल्याने सरकार अडीच वर्षे टिकणे कठीण आहे. अडीच वर्षांपूर्वी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत बहुमत प्राप्त केले होते. तेव्हा १७० आमदारांचा सरकारला पाठिंबा होता, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे १०५ सदस्य होते. सत्ताधारी आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडे ४४, राष्ट्रवादीकडे ५३ आणि शिवसेनेकडे ५५ असे एकूण १५२ सदस्य आहेत. सत्ताधारी बाकावरील बाजूला २८८ च्या निम्मे म्हणजे १४५ सदस्यांचे पाठबळ असावे लागते. आज लागलेल्या विधान परिषद निकालात आघाडीकडे काठावर बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीच्या नाराज असलेल्या बंडखोरांनी बंड केल्याने सरकार अल्पमतात आले आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीची मते फोडून भाजपाने सरकार डळमळीत होईल, अशा पद्धतीने पावले टाकली त्यामध्ये बंडखोरांना उत्तेजन मिळाले आणि सरकार अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना भाजप बरोबर जाण्याच्या निर्णयाआधी किंवा सेनेला धक्का देण्याआधी आणखी १७ आमदारांची गरज आहे. म्हणजेच आमदार शिंदे यांच्या पाठीमागे ३७ आमदारांचं पाठबळ लागेल. परंतु एवढे आमदार पाठीशी नसल्याने दुसऱ्यांदा बंड फसेल अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.  
शिवसेनेत फुट पाडणारे एकनाथ शिंदे-शिवसेनेत फूट पाडणारे सूत्रधार हे एकनाथ शिंदे कोण आहेत तर एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्यामुळेच शिवसेनेचा झेंडा हाथी घेतला. दिघेंनी 1984 मध्ये मध्ये शिंदे यांची किसन नगरच्या शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या नंतर दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2004 मध्ये एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत होते निवडून आले होते. 2009, 2014 आणि 2021 मध्ये ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेत पोहचले. म्हणजेच एकनाथ शिंदे चार वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत विधानसभेमध्ये पोहोचले आहेत. 2019 च्या सुरुवातीला त्यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी देखील सांभाळली होती. एकनाथ संभाजी शिंदे सध्या शिवसेनेचे नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.

शिवसेनेतील बंडात हे आमदार सामील असल्याची चर्चा-

मुंबई- 1. मागाठाणे आमदार प्रकाश सुर्वे,.
मराठवाडा - 1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.,2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे,3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट,4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत,5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे,6. नांदेडचे बालाजी कल्याणकर,.
कोकण- 1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी,2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,.
पश्चिम महाराष्ट्र- 1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर,2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर,3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई,4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील,5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे.
ठाणे- 1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर,2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा,.3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे, 4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर,.
उत्तर महाराष्ट्र- 1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील,.
विदर्भ- 1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, 2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड,.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत खालील नेते उपस्थित-

रवींद्र वायकर,गुलाबराव पाटील, संजय राऊत,नीलम ताई गोरे,दादा भुसे,उदय सामंत,संजय राठोड,वैभव नाईक,दिवाकर रावते, उदयसिंग राजपूत, विनायक राऊत, नरेंद्र दराडे, अनिल देसाई, विकास पोतनीस, विनायक राऊत, सुभाष देसाई, वरूण सरदेसाई,अरविंद सावंत,किशोर दराडे, किशोर साळवी,आमशा पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, सचिन अहिर ,सुनील शिंदे, सचिन पडवळ, अंबादास दानवे, मंगेश कुडाळकर, प्रकाश फातर्पेकर, राहुल शेवाळे, राहुल पाटील, सुनील प्रभू, दिलीप लांडे, राजन साळवी.

राज्यसभेनंतर महाविकास आघाडीवर पराभवाची नामुष्की

राज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत पाच उमेदवार निवडून आणले. तर शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यांचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी बाजी मारली. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पडवी विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले. काँग्रेसकडून भाई जगताप विजयी झाले, तर चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते घेतली होती आता विधान परिषद निवडणुकीत 134 मते घेतली. महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 21 मते फुटली. त्यात शिवसेनेची तीन मते इतरांनी पळवली, तर राष्ट्रवादीच्या पारड्यात सहा मते अतिरिक्त पडली. काँग्रेसची तीन मते फुटल्याचे समजते. 44 पैकी 41 मते काँग्रेसला पडली.

विजयी उमेदवार (कंसात मते)
भाजप- प्रवीण दरेकर (26), श्रीकांत भारतीय (26), उमा खाकरे (26) राम शिंदे (26), प्रसाद लाड (28)
शिवसेना- आमशा पाडवी (26), सचिन आहिर (26)
राष्ट्रवादी- रामराजे निंबाळकर (26), एकनाथ खडसे (27)
काँग्रेस- भाई जगताप (26), चंद्रकांत हंडोरे (22) (पराभूत) 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.