Monday 9 July 2018

विधान परिषदेचे ११ आमदार बिनविरोध ; विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जाणार?

विधान परिषदेचे ११ आमदार बिनविरोध


विधानसभेतून ज्येष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ सदस्यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी साेमवारी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सर्वच्या सर्व ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस ३, शिवसेनेचे २, शेकाप आणि रासप प्रत्येकी १ अशा ११ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत २७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ११ अर्ज अपेक्षित होते. मात्र, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपच्या तिकिटावर अर्ज भरण्यास नकार दिला होता. त्यांनी ‘रासप’च्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे भाजपने १२ वा उमेदवार रिंगणात उतरवला होता. परिणामी मतदान होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज देशमुख यांना शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि मतांसाठी होणारा घोडेबाजारही टळला. सायंकाळी पाच वाजता सर्व ११ उमेदवारांना निवडून आल्याची प्रमाणपत्रे निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. या निवडीमुळे भाजप-शिवसेनेच्या परिषदेतील संख्याबळात मोठी वाढ झाली अाहे. त्यामुळे सध्या विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्यास आलेले सभापती आणि उपसभापतिपद धोक्यात आले आहे.पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त असलेल्या जागेवर संधी मिळावी म्हणून भाजपमध्ये अनेकांचा डोळा आहे. ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माघार घ्यावी लागल्याने आगामी पोटनिवडणुकीत संधी मिळावी, असा पृथ्वीराज देशमुख यांचा प्रयत्न असेल. विदर्भातील काही नेते इच्छुक आहेत.  विधानपरिषदेत भाजपाचे सर्वाधिक २३ आमदार झाले असले तरी राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांच्या सभापतिपदाच्या खुर्चीला कोणताही धोका नाही. ७८ सदस्य असणाऱ्या विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाकडे ३८ सदस्य आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य सहयोगी पक्षाचे मिळून ४० सदस्य झाले आहेत. शिवाय सोमवारी बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी २६ जुलैपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत पावसाळी अधिवेशन संपून जाणार आहे.विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कालावधी २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. आज ११ अर्जच शिल्लक राहिल्यामुळे हे सगळे बिनविरोध निवडून आले असले तरी त्यांचे पहिले अधिवेशन हिवाळी अधिवेशन असेल. नव्या समीकरणानंतर भाजपाचे २३, शिवसेनेचे १३, नागो गाणार आणि प्रशांत परिचारक असे दोघे भाजपाकडे असणारे आमदार, अशी एकूण ३८ आमदारांची संख्या सत्ताधारी पक्षांकडे आहे. तर काँग्रेस १७, राष्ट्रवादी १७, जयंत पाटील (शेकाप), बळीराम पाटील (अपक्ष), जोगेंद्र कवाडे (कवाडे गट), दत्तात्रय सावंत (अपक्ष) आणि कपिल पाटील (लोकभारती), असे एकूण ४० सदस्य विरोधी बाकावर आहेत. दोनचा फरक जरी असला तरी येणाºया काळात विधानपरिषदेत सत्तासंघर्ष सतत पाहायला मिळेल, असे चित्र आहे. उपसभापती माणिकराव ठाकरे यांना काँग्रेसने पुन्हा संधी न दिल्यामुळे आता उपसभापतिपद रिकामे होत आहे. या पदासाठी स्वत:जवळच्या ४० सदस्यांच्या भरवशावर काँग्रेस पुन्हा आपला हक्क सांगणार की, हे पद भाजपा, शिवसेना घेणार, यावर आतापासूनच खल चालू आहे. उपसभापती शिवसेनेने घ्यावे आणि त्याजागी परिषदेतील ज्येष्ठ मंत्र्यांची नियुक्ती करावी आणि मंत्रिपद विधानसभेच्या सदस्याला द्यावे, असा आग्रह शिवसेनेतून सुरू झाला आहे. आता सत्ताधारी भाजप सत्तेत आल्यानंतर साडेतीन वर्षांनी विधानपरिषदेत सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष झाला आहे. भाजपचं संख्याबळ 21 झालं आहे, तर सत्ताधाऱ्यांचं एकूण संख्याबळ 40 म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त झालं आहे. परिणामी विधानपरिषदेत सत्ताधारी बहुमतात आले आहेत.तर याआधी एक नंबरवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटलं असून आता त्यांच्या आमदारांची संख्या काँग्रेसएवढी म्हणजेच 17 झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे असलेलं सभागृहाचं सभापती, उपसभापती ही पदं आता त्यांच्या हातातून जाऊ शकतात.विधानपरिषदमध्ये भाजप संख्येने एक नंबरचा पक्ष झाला आहे. यामुळे भाजप, शिवसेना, मित्रपक्ष आणि अपक्ष यांचं संख्याबळ आता विरोधकांपेक्षा जास्त झालं आहे.

उपाध्यक्षपदही रिकामेच!

राज्याच्या इतिहासात विधानसभेचे उपाध्यक्षपद जवळपास साडेतीन वर्षे रिकामे राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपाने अध्यक्षपद हरिभाऊ बागडे यांना दिले; मात्र उपाध्यक्षपद रिवाजाप्रमाणे विरोधीपक्षाला द्यावे, असे अपेक्षित असताना ते दिले गेलेले नाही. भाजपा सत्तेवर आल्यानंतर शिवसेना विरोधात होती; त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे औटघटकेचे विरोधीपक्षनेते झाले होते. मात्र शिवसेनेत सत्तेत प्रवेश केल्यामुळे ते पद काँग्रेसकडे आले. आता विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे, असा त्यांचा दावा आहे. पण या पदासाठी भाजपाने कोणतीही घाई केलेली नाही.

राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार विधानपरिषदेत!

रासपचे अध्यक्ष आणि पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर विधानपरिषदेसाठी भाजपच्या पाठिंब्यावर बिनविरोध निवडून आले आहेत. इतिहासात रासपचा पहिलाच आमदार विधानपरिषदेत आला असून विधानसभेत पुण्यातील दौड येथील आमदार राहुल कुल हे रासपचे आमदार आहेत.महादेव जानकर यांचा मुद्दा भाजपच्या दृष्टीने संवेदनशील होता. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. या समाजाला सत्तेत आल्यावर आरक्षण देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण धनगर आणि धनगड या शब्द प्रयोगामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. आरक्षणाच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याने आधीच धनगर समाजात सत्ताधारी भाजपविरोधात नाराजीची भावना आहे. अशा वेळी समाजाचे नेते जानकर यांना दुखावल्यास धनगर समाजात आणखी वेगळा संदेश गेला असता. हे टाळण्यासाठी जानकर यांचा स्वत:च्या पक्षाच्या उमेदवारीवर अर्ज भरण्याचा हट्ट भाजपला पुरवावा लागला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीपर्यंत सुटण्याची शक्यता कमीच आहे. 

विधानपरिषद निवडणूक - बिनविरोध पक्षनिहाय उमेदवार 

भाजप - भाई गिरकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचा नातू), राम पाटील रातोळीकर
रासप - महादेव जानकर,
शिवसेना - अनिल परब, मनिषा कायंदे
काँग्रेस - शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा
राष्ट्रवादी काँग्रेस - बाबाजानी दुर्राणी
शेकाप- जयंत पाटील

विधानपरिषदचे पक्षीय बलाबल

भाजप - 21
राष्ट्रवादी - 17
काँग्रेस  - 17
शिवसेना  - 12
जदयु - 1
आरपीआय कवाडे गट -01
रासप - 1
शेकाप - 1
अपक्ष - 6
रिक्त - 1
एकूण 78

७८ सदस्य मर्यादा असलेल्या विधान परिषदेत आता काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे एकूण ३४, अधिक शेकाप २, जदयू १, पीआरपी १ आणि १ पुरस्कृत सदस्य असे ३९ सदस्यबळ आहे. तर भाजप-शिवसेनेकडे दोघांचे एकत्रित ३४, रासप १ आणि ४ पुरस्कृत-अपक्ष असे ३९ संख्याबळ आहे.

सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ-भाजपाकडे 21, शिवसेना 12, रासप 1, अपक्ष आमदार 2 (भाजप समर्थक), अपक्ष आमदार 3 (शिवसेना समर्थक), पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने झालेली रिक्त झालेली एक जागा, अशी सत्ताधाऱ्यांचं 40 चे संख्याबळ.

विरोधकांचं संख्याबळ-काँग्रेस 17,  राष्ट्रवादीचे 17,  जनता दल युनायटेड 1, शेकाप 1, आरपीआय (कवाडे गट) 1, अपक्ष एक असे एकूण 38 संख्याबळ


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.