Monday 30 December 2019

राज्य मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी ;मंत्रिमंडळात मराठा समाजाचे वर्चस्व

राज्य मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी 

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. विधानभवनात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. विधीमंडळाच्या प्रांगणात आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी पार पडला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विधीमंडळाच्या प्रांगणात हा शपथविधी पार पडला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदी उपस्थित होते. राज्यातील ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधी दरम्यान आज पुन्हा एकदा नाट्यमय घटना घडली. काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांनी शपथ घेताना स्वत:चे मनोगत व्यक्त केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज संतप्त झाले. त्यांनी पाडवी यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एक नमुना ठरलेला असतो. शपथ घेताना त्यातील मजकूर वाचणे अपेक्षित असते. मात्र, काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार पाडवी यांनी शपथेच्या नमुन्याखेरीज स्वत:चे मनोगतही व्यक्त केले. त्यामुळे राज्यपाल संतापले. त्यांनी पाडवी यांना समज दिली. आपल्याला दिले गेले आहे तेच वाचावं. अनावश्यक वाचू नये, असे राज्यपाल म्हणाले. 'माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ नेते बसले आहेत. स्वत: शरद पवार आहेत. वाटल्यास त्यांना विचारा. त्यांना योग्य वाटत असेल तर माझी हरकत नाही, असेही राज्यपाल म्हणाले. तसेच, पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. त्यानंतर पाडवी यांनी परंपरेनुसार शपथ घेतली. शपथपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर पाडवी यांनी राज्यपालांची माफीही मागितली. दरम्यान महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांसह आणि तरुण मंत्र्यांचाही समावेश असणार आहे. असे असले तरी मंत्रिमंडळात 'राजकीय आर्शिवाद' महत्त्वाचा ठरला आहे. राजकीय कुटुंबातील वारस असेलेल अनेक चेहरे या मंत्रिमंडळात दिसून येत आहेत. पहिल्यांदाचा निवडून आल्यानंतर विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आदित्य ठाकरे यांची शिवसेनेने थेट कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लावली आहे. मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे ही ठाकरेशाही सत्तेत चांगलीच रमली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले. आणि तिसऱ्यावेळी थेट कॅबिनेटमंत्रिपदापर्यंत अमित देशमुख पोहोचले. दोन वेळा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र होय. गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि पंकजा मुंडेंचे चुलत बंधू असलेले धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत तयार झाले. भाजयुमोमध्ये मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आता कॅबिनेट मंत्रिपदावर त्यांनी झेप घेतली.जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत बडे नेते अंकुशराव टोपे यांचे पुत्र राजेश टोपे आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. अंकुशराव टोपे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले होते. नगर जिल्ह्यातले बडे नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाख थेट कॅबिनेटमंत्री झाले. गडाख कुटुंबाचे नगर जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. नगर जिल्ह्यातला सत्तेच्या सोयऱ्यांचा गोतावळा या कुटुंबाने सांभाळलेला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम यांनी राज्य काँग्रेसमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारती विद्यापीठाचे सचिव असलेले विश्वजीत कदम राज्यातल्या बड्या राजकीय कुटुंबातून येतात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लागली आहे. धारावी मतदारसंघातून सातत्याने निवडून येणाऱ्या वर्षा गायकवाडांना काँग्रेसने संधी दिली आहे. मात्र, मुंबईतून प्रतिनिधीत्व देताना काँग्रेसने घराणेशाहीच कायम ठेवली. खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे पहिल्यांदाच निवडून येऊन थेट राज्यमंत्री बनल्या आहेत. रायगड जिल्ह्यातले बडे प्रस्थ असलेल्या तटकरे कुटुंबानंही घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते.आजच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेकडून एकूण सहा आमदारांनी पहिल्यांच मंत्रिपदाची शपथ घेतली. यात, आदित्य ठाकरे यांच्यासह अनिल परब, शंभुराजे देसाई, उदय सामंत, संदीपान घुमरे, शंकरराव गडाख यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे आणि बाळासाहेब पाटील यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून नवे चेहरे म्हणून सुनील केदार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, अस्लम शेख आणि के. सी. पडवी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान शिवसेनेने मागील मंत्रिमंडळातील दीपक केसरकर, रविंद्र वायकर, तानाजी सावंत, दिवाकर रावते, रामदास कदम यांना वगळले आहे. मागील सरकारमधील विजय शिवतरे, जयदत्त क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या मंत्रिमंडळ विस्तारात विधान परिषदेतून शिवसेनेने अॅड. अनिल परब यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर, सुभाष देसाई यांना महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे आता विधान परिषदेतील दोन आमदारांचा समावेश शिवसेनेने मंत्रिमंडळात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेले कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकलेली नाही. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. त्यांनी कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांच्यासारख्या दिग्गज भाजपा नेत्याचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वसामान्यांच्या अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत. रोहित पवार हे राजकीय दृष्टया देखील तितकेच प्रगल्भ आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी शक्यता होती. पण त्यांना संधी मिळू शकली नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन महिलांचा समावेश करण्यात आला असून दोन महिला कॅबिनेट मंत्री असणार आहे. काँग्रेसने यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. शिवसेनेच्या दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत. चोपडा मतदारसंघातून लता सोनावणे आणि भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव निवडून आल्या आहेत. मात्र, त्यापैकी एकाही महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तासगाव मतदारसंघातून सुमनताई पाटील, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, देवळालीतून सरोज अहिरे विजयी झाल्या. त्यापैकी अदिती तटकरे यांना राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर, काँग्रेसमधून अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, सोलापूर शहर मध्यतून प्रणिती शिंदे, वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड आदी विजयी झाल्या. त्यापैकी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजिव प्राजक्तने पहिलीच निवडणूक जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकलेल्या प्रसाद यांची थेट राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मराठा समाजातील आमदारांचे 50 टक्क्यांहून वर्चस्व असल्याचे स्पष्ट दिसत असून, या सरकारच्या मंत्रिमंडळात तब्बल 23 मंत्री मराठा समाजातील आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिमंडळात मराठा नेत्यांचे वर्चस्व होते. पण, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या समाजाचे वर्चस्व कमी झाले होते. पण, आता ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा वर्चस्व दाखविले आहे. मंत्रिमंडळात आज समावेश झालेल्या 36 मंत्र्यांपैकी 23 मंत्री मराठा समाजातील आहेत. त्यानंतर मुस्लिम समाजातील 4, ओबीसी वर्गातील 4, नवबौद्ध समाजातील 3 आणि आदिवासी वर्गातील 1 मंत्र्यांचा समावेश आहे. 

पहिल्यांदाच निवडून आले अन् थेट मंत्री-

* शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. 
* राष्ट्रवादी काँगेसच्या आमदार आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
* राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.
* शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख नेवासा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
* कोल्हापूरमधील शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची यादी=

मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे, शिवसेनाउपमुख्यमंत्री – अजित पवार, राष्ट्रवादी

कॅबिनेट मंत्री

१. एकनाथ शिंदे, शिवसेना
२. सुभाष देसाई, शिवसेना
३. बाळासाहेब थोरात, काँग्रेस
४. नितीन राऊत, काँग्रेस
५. जयंत पाटील, राष्ट्रवादी
६. छगन भुजबळ, राष्ट्रवादी
७. अशोक चव्हाण, काँग्रेस
८. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
९. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
१०. विजय वडेट्टीवार, काँग्रेस
११. अनिल देशमुख, राष्ट्रवादी
१२. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
१३. वर्षा गायकवाड, काँग्रेस
१४. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी
१५. नवाब मलिक, राष्ट्रवादी
१६. राजेश टोपे, राष्ट्रवादी
१७. सुनिल केदार, काँग्रेस
१८. संजय राठोड, शिवसेना
१९. गुलाबराव पाटील, शिवसेना
२०. अमित देशमुख, काँग्रेस
२१. दादा भुसे, शिवसेना
२२. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी
२३. संदिपान भुमरे, शिवसेना
२४. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
२५. यशोमती ठाकूर, काँग्रेस
२६. अनिल परब, शिवसेना
२७. उदय सामंत, शिवसेना
२८. के.सी. पाडवी, काँग्रेस
२९. शंकरराव गडाख, अपक्ष
३०. असलम शेख, काँग्रेस
३१. आदित्य ठाकरे, शिवसेना

राज्यमंत्री

१. अब्दुल सत्तार, शिवसेना
२. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस
३. शंभूराजे देसाई, शिवसेना
४. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी
५. विश्वजीत कदम, काँग्रेस
६. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
७. आदिती तटकरे, राष्ट्रवादी
८. संजय बनसोडे, राष्ट्रवादी
९. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी
१०. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=================================
===

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.