Wednesday 27 November 2019

गुगल ट्रेण्डवर अजितदादांचा बोलबाला; शरद पवार अन् फडणवीसांनाही टाकले मागे

देशभरातील राज्यांची वाटचाल भाजपमुक्तीकडे

२८२ आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली; ६ आमदार गैरहजर

गेल्या चार दिवसांपासून गुगल ट्रेण्डवर अजितदादांचा बोलबाला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अन् माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मागे टाकले आहे. गुगल ट्रेण्डनुसार शनिवारी सकाळी साडेसातपासून अजित पवार यांच्याबद्दल सर्च होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत सतत अजित पवार यांचे नाव सर्च होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे भाजपाच्या हातून आणखीन एक राज्य निसटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती. देशभरातील राज्यांची वाटचाल भाजपमुक्तीकडे सुरु आहे. दरम्यान २८८ पैकी २८२ आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली असून ६ आमदार गैरहजर होते. महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुंबईतील महाराष्ट्र विधिमंडळातील नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचे कामकाज पूर्ण झाले. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज, बुधवारी विधानभवनात पार पडले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतीय संविधानाच्या प्राप्त अधिकाराचा वापर करून हे अधिवेशन आमंत्रित करण्याचे निर्देश विधिमंडळाच्या सचिवांना दिले होते. नवनिर्वाचित आणि युवा आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, क्षीरसागर यांच्यासह २८२ आमदारांनी तब्बल महिनाभरानंतर आमदारकीची शपथ घेतली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना शपथ दिली. त्यानंतर हे एका दिवसाचे अधिवेशन संपले. तर काही राजकीय घडामोडींवर अजित पवारांविषयी योग्य वेळी बोलेन असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे तर राष्ट्रवादीने कधीच माझी हकालपट्टी केली नव्हती असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या निर्णयावर टीका केली असून सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले आहे. एकत्र लढलो असतो तर जास्त जागा जिंकता आल्या असत्या असे त्यांनी म्हंटले आहे.  

गुगलवर अजित पवारांचे नाव अधिक सर्च

मागील चार दिवसांपासून देशभरामध्ये केवळ आणि केवळ अजित पवार यांची चर्चा असल्याचे गुगल ट्रेण्डवरुन दिसून येत आहे. शनिवारपासून अजित पवार यांचे नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांपेक्षा अधिक सर्च झाल्याचे दिसून येत आहे. गुगल ट्रेण्डनुसार शनिवारी सकाळी साडेसातपासून अजित पवार यांच्याबद्दल सर्च होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत सतत अजित पवार यांचे नाव सर्च होत असल्याचे दिसत आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत अजित पवारांचे नाव अधिक सर्च झाल्याचे दिसते. मेघालय, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, सिक्कीम, गोवा, केरळ, आसामसारख्या राज्यांमधूनही अजित पवार यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च झाले आहे. महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्याबद्दल ४३ टक्के सर्च झाले. शरद पवारांबद्दल ३९ टक्के आणि फडणवीस यांच्याबद्दल १८ टक्के सर्च झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिझोरमसारख्या राज्यामध्ये फक्त अजित पवारांबद्दल सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्ड सांगत आहे. गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटकमधूनही अजित पवारांबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

देशभरातील राज्यांची वाटचाल भाजपमुक्तीकडे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. यामुळे भाजपाच्या हातून आणखीन एक राज्य निसटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती. २०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली. २०१४ साली भाजपा गुजरात, मध्यप्रेधेस, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती. तामिळनाडू (एआयएडीएमके), केरळ (एलडीएफ), कर्नाटक (काँग्रेस), मिझोरम (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), ओदिशा (बीजेडी), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस) आणि तेलंगण (टीआरएस) या आठ राज्यांमध्ये भाजपा सरकार नव्हते. भाजपाची देशातील विजयी घौडदौड मंदावली असली तरी त्यांनी मिझोरमसारख्या राज्यातही विजय मिळवत सत्ता स्थापन केली. असं असलं तरी दुसरीकडे बालेकिल्ला मानली जाणारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधील सत्ता भाजपाने गमावली. आंध्रप्रदेशमध्येही तेलगू देसम पार्टीने भाजपापासून फारकत घेत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्येही डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने तेथेही भाजपा आणि पीडीपीचे सरकार बरखास्त झाले. २०१९ मध्येही भजापाची पडझड सुरुच राहिली. लोकसभेमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले. स्थानिक स्तरावरील राजकारणामध्ये मात्र भाजपाला फटका बसल्याचे दिसले. कर्नाटकमध्ये जुलै महिन्यामध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. अशाचप्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपाचा डाव महाविकास आघाडीने उधळून लावला आहे. 

सत्ता पालटामुळे अनेकांचे स्वप्न भंगले!

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही भाजप सहज विजयी होणार असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाच वर्षे सत्तेत नसलेल्या आमदारांना पुन्हा एकदा सत्तेत जाण्याचे वेध लागले होते. त्या अनुषंगाने अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र यापैकी अनेक नेते पराभूत झाले असून विजयी झालेले नेते आता विरोधात बसणार आहेत. मात्र शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचे साधणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नमिता मुंदडा, सुरेश धस, राणा जगजितसिंह, गणेश नाईक तर काँग्रेसमधून राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे भाजपमध्ये गेले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या महाविकास आघाडीमुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे. भाजपमध्ये दाखल झालेल्या नमिता मुंदडा यांच्यासह राणा जगजितसिंह, गणेश नाईक विजयी झाले आहेत. परंतु, भाजप पक्ष विरोधात बसल्यामुळे या नेत्यांना पुन्हा एकदा विरोधात बसावे लागणार आहे. त्यातच भाजपने मुळ नेत्यांना प्रधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नेत्यांची चांगलीच गोची होणार आहे. या नेत्यांव्यतिरिक्त काँग्रेसचे विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि नारायण राणे यांना पक्षात मोठा मान होता. विखे पाटील विरोधीपक्षनेते होते. या नेत्यांना आता मंत्रीपदाची संधी मिळाली असती. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय या नेत्यांच्या अंगलट आलेला आहे. नारायण राणे आता राज्यसभेवर खासदार असून आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना विरोधीपक्ष नेतेपदही मिळण्याची शक्यता नाही. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्याने शिवसेनेत जावून आमदार झालेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसनेते अब्दुल सत्तार यांचे चांगलेच दिवस आले आहेत. शिवसेना सत्तेत असून खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याने याचा लाभ अब्दुल सत्तार यांना होणार असून मंत्रीपदीही त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच आमदार नमिता मुंदडा, सुरेश धस, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, जगजितसिंहराणा, गणेश नाईक यांची वाट सत्ताकारणाच्या दृष्टीकोनातून चुकली असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत. दरम्यान भाजपचीच पुन्हा सत्ता येणार व राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री आता कोथरूडमधून आमदार झाल्याने कोथरूडकरांसह पुण्याचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा दावा शहर भाजपने केला़ होता. परंतु कोथरूडमधून विजयी झालेले व पुण्याचे कारभारी होण्याचे चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न पूर्णपणे भंगले गेले आहे़. तसेच पर्वतीच्या आमदार व पुणे भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ व चिंचवडचे आमदार व पिंपरी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या पदरीही निराशा आली आहे. तर पुणे जिल्ह्यातून माजी मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पर्वती मतदारसंघातून हॅट्रिक करणाऱ्या पक्षाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचीही मंत्रिपदाची संधी हुकली गेली़. तर पिंपरी-चिंचवड शहरातून मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या पदरीही निराशा आली आहे़. 
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.