Thursday 21 November 2019

या महापालिकेत बहुमत असताना भाजपचा पराभव; काँग्रेसचे महापौर

लातूर पालिकेत काँग्रेसचा महापौर

लातूर पालिकेत बहुमत असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यातल्या बदलेल्या सत्तासमीकरणांचे पडसाद राज्यात इतरत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याचा प्रत्यय लातूर महापालिकेत आला आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर महानगरपालिकेत सत्तांतर घडून आले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आलेत.  काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेले नगरसेवक सद्यस्थितीत भाजपचे असलेले नगरसेवक फुटले आणि काँग्रेसच्या पारड्यात मते पडली. हात उंचावून झालेल्या मतदानात काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ तर भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते मिळाली. भाजपसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. 
लातूर महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल (एकूण जागा - 70)
भाजप - 36 (एका नगरसेवकाचं निधन झाल्यानं ती जागा रिक्त आहे.)
काँग्रेस - 33
वंचित - 1
वंचितमध्ये असलेले एक नगरसेवक खरंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. राज्यात बदलत असलेल्या सत्ता समीकरणाचे आता जिल्ह्याजिल्ह्यात परिणाम जाणवू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर महापालिकेतील भाजपचे वर्चस्व काँग्रेसने संपुष्टात आणले आहे. आज झालेल्या लातूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ मते मिळाली. तर भाजपाचे शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते मिळाली. त्यामुळे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहे. भाजपचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केले. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडून वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले राजा मणियार यांनी काँग्रेसला साथ दिल्याने भाजपला पराभव स्विकारावा लागला आहे.धक्कादायक बाब म्हणजे उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. उपमहापौरपदासाठी उभे असलेले भाजपचे बंडखोर नगरसेवक चंद्रकांत बिराजदार हे निवडून आले आहेत. त्यांना ३५ मते घेत भाजपच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री कौळखेर यांचा पराभव केला. कौळखेर यांना ३२ मते मिळाली. भाजपच्या नगरसेविका शकुंतला गाडेकर या अनुपस्थित राहिल्याने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे एक मत कमी झाले. लातूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसवण्यासाठी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी खास रणनीती आखली होती. त्यांनी भाजपच्या दोन्ही नगरसेवकांना गळाला लावतानाच दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत याची काळजी घेतली होती. त्यामुळेच संख्याबळ कमी असतानाही लातूर महापालिकेतील भाजपकडे असलेलं महापौरपद खेचून आणण्यात देशमुख यांना यश आले आहे. देशमुख यांच्या या रणनीतीमुळे माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

उल्हासनगर पालिकेत भाजपला मोठा धक्का; शिवसेनेच्या लीलाबाई आशन महापौरपदी


उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण महासेनाआघाडीच्या बळावर शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. संख्याबळ वाढवण्यासाठी ‘साई’ पक्षाला विलीन करण्याची भाजपची खेळी अयशस्वी ठरले. शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे ‘साई’ पक्ष महापौरपदाच्या स्पर्धेत किंगमेकर ठरणार होता. त्यामुळे भाजपने ‘साई’ पक्षालाच आपल्यात विलीन करुन घेण्याचा डाव फसला. उपमहापौरपदावर असलेल्या ‘साई’ पक्षाच्या जीवन इदनानी यांना महापौरपदाची ऑफरही भाजपने दिली होती. परंतु ऐनवेळी बाजी पलटली आणि शिवसेनेच्या नगरसेविका लीलाबाई आशन महापौरपदी विराजमान झाल्या. महापालिकेत एकूण 78 नगरसेवक असून 40 ही मॅजिक फिगर आहे. त्यात भाजपचे सर्वाधिक 32, तर शिवसेनेचे 25 नगरसेवक आहेत. सध्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरांचा पाठिंबा मिळणे साहजिक अपेक्षित होते. त्यानंतरही शिवसेनेची संख्या भाजपइतकीच म्हणजे 32 वर जात होती. परंतु टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर महासेना आघाडीला बहुमत गाठण्यात यश आले. कोल्हापूरपाठोपाठ उल्हासनगरमध्येही महासेनाआघाडीचा विजय झाला. गेल्या अडीच वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि साई पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही साई पक्षाने स्वतंत्रपणे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. भाजपच्या तिकीटावर लढलेल्या पप्पू आणि ज्योती कलानी यांच्या स्नुषा, ओम कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी उल्हासनगरच्या महापौर होत्या. परंतु कलानी गटाने आता सेनेच्या पारड्यात मत टाकले. आमच्याशिवाय सत्तास्थापन करता येणार नाही, असा भाजपचा समज होता असे ओमी कलानी म्हणाले. भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना मित्रपक्ष असलेल्या ओमी कलानी गटाचे नगरसेवक मात्र सोबत नव्हते, तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु कलानी गट आपल्यासोबत असल्याचा दावा करणारे भाजप पदाधिकारी महापौरपदाच्या निवडणुकीत तोंडघशी पडले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या भाजप नगरसेविका माई ढोरे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी वर्णी लागली आहे. तर उपमहापौरपदी क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांना नाव चर्चेत नसतानाही उपमहापौर पदाची लॉटरी लागली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांचा माई ढोरे यांनी 40 मतांच्या फरकाने पराभव केला. माई ढोरे यांना 81 मते मिळाली. तर काटे यांना 41 मते मिळाली. उपमहापौर पदाचे उमेदवार नगरसेवक राजू बनसोडे यांनी माघार घेतल्यामुळे तुषार हिंगे बिनविरोध निवडुन आले. शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली. तर भाजपचे नगरसेवक शितल शिंदे हे मतदान सुरू होताच सभागृहाबाहेर पडले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर राहुल जाधव यांचा पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि. २२) रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. महापालिकेच्या या विशेष सभेत मतदान घेण्यात आले व त्यानुसार महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली.

पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ, तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे

पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे अभ्यासू नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची तर, उपमहापौपदी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची आज, शुक्रवारी बहुमतांनी निवड करण्यात आली.राष्ट्रवादीतर्फे महापौरपदासाठी जेष्ठ नगरसेवक प्रकाश कदम, तर महापौर पदासाठी काँगेसतर्फे नगरसेविका चांदबी नदाफ शेख यांना संधी देण्यात आली होती. मुरलीधर मोहोळ यांना 97 मते पडली तर, काँगेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे उमेदवार प्रकाश कदम यांना 59 मते मिळाली. या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक तटस्थ होते. पाच नगरसेवक अनुपस्थित होते. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. त्यांचे दोन नगरसेवक आज अनुपस्थित राहिले. भाजप नगरसेवकांनी भगवे फेटे घालून भाजपचे चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घातले होते. आरपीआय ( आठवले गट) च्या नगरसेवकांनी फेटा आणि गळ्यात रामदास आठवले यांचे चित्र असलेले उपरणे घातले होते. पीठासीन अधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर होते. तुतारी वाजवून नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले. पक्षाच्या आदेशानुसार मनसे तटस्थ राहणार असल्याचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.  महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीला शिवसेनेने साथ दिल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. राज्यातील सत्ता स्थापनेच्या निर्णयाआधीच पुण्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. भाजपने मुरलीधर मोहोळ यांना महापौर आणि सरस्वती शेंडगे यांना प्रत्येकी 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. मोहोळ यांनी कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान करताना आपले नाव, प्रभागाचे नाव, उभे राहून, हात वर करून मतदान घेण्यात आले. मोहोळ यांची निवड झाल्यानंतर खासदार गिरीश बापट आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला. पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.महापालिका परिसरात ढोल-ताशांच्या आवाजात निवडीचे स्वागत करण्यात आले. 2017 साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या महापालिकेत असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात होती. आजच्या निवडणुकीत त्यांना 97 तर कदम यांना 59 मते मिळाली. यावेळी मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ तर पाच नगरसेवक मतदानाच्यावेळी गैरहजर होते.  45 वर्षांचे मुरलीधर मोहोळ हे भाजपतर्फे तीन वेळा नगरसेवक पदी असून कला शाखेतील पदवीचे शिक्षण घेतले आहे. पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केले असून पीएमपीएमएलचे संचालक म्हणूनही काम केले आहे. भाजपमध्ये युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली होती. मात्र अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड करण्यात आली. उमेदवारी डावलल्याने त्यांना महापौर पदाची संधी पक्षाने दिली आहे.

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर


मुंबईच्या नव्या महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर अ‍ॅड. सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे आज ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. मुंबईच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची भाजपला संधी होती. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावावे लागले असते. मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरू असल्यामुळे पालिकेत काँग्रेसने महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचे महापौर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता निवडणूक पार पडली आहे.गिरणी कामगारांच्या कुटुंबातून असलेल्या किशोरी पेडणेकर या कट्टर शिवसैनिक आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात त्या अग्रेसर असतात. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या किशोरी यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. विधानसभा निवणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. निष्ठावान अशी ओळख असलेल्या किशोरी यांच्यावर मातोश्रीचाही विश्वास आहे. त्यामुळे महापौर पद महिला आरक्षित नसतानाही पुरुषांना डावलून किशोरी यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी यावेळी झालेली निवडणूक तब्बल ५० वर्षांनी बिनविरोध झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे ९४, भाजपाचे ८३, काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, सपाचे ६, मनसेचा १ तर एमआयएमचे दोन नगरसेवक आहेत. परिचारीका ते महापौरपद असा किशोरी पेडणेकरांचा प्रेरणादायी प्रवास आहे किशोरी पेडणेकर यांचा जन्म एका गिरणी कामगाराच्या घरात झाला होता. विवाहानंतर न्हावा शेवा येथील रुग्णालयात त्या परिचारीका म्हणून सुरुवातीला काम करत होत्या. त्यातून त्यांना समाजकार्याची गोडी निर्माण झाली. त्यांनी शिवसेना संघटनेसोबत काम करण्याचे ठरवले. त्यांनी सेनेकडून लोअर परळ, वरळी आणि आसपासच्या भागांमध्ये शिवसेनेकडून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातील उपविभाग संघटक ते नगरसेवक अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कामे केली. 2002 रोजी पहिल्यांदा त्या निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडणून आल्या. त्यांनी बालकल्याण आणि स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदासाठी काम केले आहे. त्यानंतर पुन्हा 2012 आणि 2017 रोजी किशोरी पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली होती. स्थायी समितीच्या बैठकांमध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू कायम उचलून धरली. आक्रमक आणि निष्ठावान नगरसेवक म्हणून महापालिकेत त्यांची एक वेगळी ओळख आहे. राजकारणातून समाजकारण करण्याचा त्यांचा मानस आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या भाजपचे महापौरपदी चेतन गावंडे तर कुसूम साहू उपमहापौर

चेतन गावंडे अमरावती महानगरपालिकेचे १६ वे महापौर म्हणून त्यांची निवड झाली तसेच उपमहापौरपदाची देखील हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्ये महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. यामध्ये भाजपची सदस्यसंख्या बहुमताला सापेक्ष राहिल्याने महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. त्यांना प्रत्येकी ४९ मते पडलीत. या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिलेत. महाशिवआघाडाचा प्रयत्न फसल्याने काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी माघार घेतली. महापौरपदासाठी एमआयएमचे नगरसेवक हुसेन यांना २३ मते, बसपचे माला देवकर यांना ५ मते पडली. बहुमताच्या जोरावर भाजपासाठी ठरणारी औपचारिकता निवडणूक वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यता चांगलीच वाढली होती. काँग्रेस मधून विलास इंगोले यांनी अर्ज दाखल करून आश्चर्याचा झटका विरोधकांना दिला होता. 1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार विलास इंगोले हे कमी सदस्य संख्या असतानासुद्धा महापौरपदी विराजमान झाले होते. ही राजकीय खेळी पुन्हा खेळली जाणार का अशी भीती भाजपाला पडली होती. मात्र काँग्रेसचे उमेदवार यांनी आपला अर्ज मागे घेत एमआयएमच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे भाजपाकडे 45 सदस्यसंख्या होती व युवा स्वाभिमान, 3 सदस्य, व रिपाई आठवले गटाच्या 1 सदस्य यांनी भाजपाला मतदार केल्याने भाजपाकडे एकूण 49 सर्वधिक सदस्य संख्याबळ झाले. तर एम आय एम ला काँग्रेसने सह अन्य पक्षांनी मतदान करून एमआयएमच्या उमेदवाराला 21 मतदान मिळाले त्यामुळे सर्वाधिक मतदान हे भाजपाच्या वाटेने झाल्यामुळे भाजपचा महापौरपदी चेेेतन गावंडे तर उपमहापौर कुसुम शाहू यांची निवड करण्यात आली. 

चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या राखी कंचरलावार यांची निवड

चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या राखी कंचरलावार यांचा विजय झाला आहे. कंचरलावार यांनी काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांचा पराभव केला. राखी यांना 42 तर कल्पना यांना 22 मते मिळाली. दोन सदस्य अनुपस्थित होते. सलग चौथ्यांदा चंद्रपूरच्या महापौरपदी महिलेची निवड झाली आहे. भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूर शहराच्या नव्या महापौर असतील, तर भाजपच्या राहुल पावडे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी महापौरपदासाठी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या कंचर्लावार दुसऱ्यांदा ही जबाबदारी सांभाळणार आहेत. 2014 मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपची मदत घेत राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्या भाजपच्या तिकिटावर नगरसेविका झाल्या. चंद्रपूर शहर महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठीची निवडणूक गांधी चौकातील महात्मा गांधी भवनात झाली. राणी हिराई सभागृहात सर्वप्रथम महापौर निवडणुकीतील काँग्रेसच्या सुनिता लोढीया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत थेट लढत भाजपच्या राहुल पावडे आणि काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांच्यात होणार असल्याचे निश्चित झाले. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांना 42 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना 22 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची लढत काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांच्याशी झाली. तिथेही 42 विरुद्ध 22 मतांनी भाजपचा विजय झाला. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तागट नव्या महापौरपदाच्या उमेदवारीबद्दल नाराज असल्याच्या वार्ता होत्या. त्यासाठी या सर्व नगरसेवकांना पेंच आणि नंतर ताडोबातील रिसॉर्टमध्ये पर्यटन घडवण्यात आले. भाजपला आपला स्वतःचा गट एकत्र ठेवण्यात यश मिळाले असून त्यामुळे शहर मनपावर भाजपचा पुन्हा एकदा झेंडा रोवला गेला आहे. राखी कंचर्लावार यांचा राजकीय प्रवास आहे की, त्यांनी 2012 मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला तर अडीच वर्षांनंतर शहराच्या दुसऱ्या महापौर झाल्या आहेत. 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. यावेळीही महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर पुन्हा महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.  चंद्रपूर मनपा महापौरपदाच्या आतापर्यंत चारही सोडतीमध्ये महिलांसाठी आरक्षण होते.

ठाणे महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के व उपमहापौरपदी पल्लवी कदम बिनविरोध

ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक नरेश म्हस्के यांची महापौर, तर नगरसेविका पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. गुरुवारी म्हस्के यांनी महापौर तर कदम यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि सर्व शिवसेना नगरसेवक उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या महापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांची तर उपमहापौरपदी पल्लवी पवन कदन यांची आज बिनविरोध निवड झाली. ठाणे महापौरपदासाठी नरेश म्हस्के तर उपमहापौरपदासाठी पल्लवी कदम असा प्रत्येकी एकच अर्ज आला होता. त्यामुळे या दोन्ही पदांच्या निवडीची केवळ औपचारिकता उरली होती. ती औपचारिकता आज ठाणे पालिका सभागृहात पूर्ण झाली. ही बिनविरोध निवड पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने ठाणे महापालिका परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्यात येणार होता. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेविरुद्ध उमेदवार देऊ नये, अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादीने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळेच ठाणे महापौरपदावर शिवसेनेचे नरेश म्हस्के बिनविरोध विराजमान झाले आहेत. 

नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी

नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या खुर्चीवर भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत. शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनीही भाजपाला पाठिंबा दिला आहे. यासोबतच भाजपच्या दहाही बंडखोरांनी बंडखोरी मागे घेत पुन्हा भाजपाला पाठिंबा दिला. यामुळे भाजपाचा विजयाचा मार्ग सुकर झाला. राज्यात आता महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेनेने पुढाकार घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान भाजपाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली. यामुळे नाराज झाल्याने सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले 10 ते 15 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते. त्यामुळे 65 नगरसेवक असूनही भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. मात्र मनसेने भाजपला पाठिंबा दिला. तर महाशिवआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला. या वादामुळे महाशिवआघाडी फुटली. त्यामुळे भाजप आपला महापौर निवडण्यात यशस्वी झाले आहे. नाशिकच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेत रस्सीखेच होती. भाजपकडून महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदासाठी भिकुबाई बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण नाशिकच्या महापौर निवडणूकीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा भाजपचे फुटीर नगरसेवक परत भाजपच्या तंबूत परतले. त्यामुळे भाजपचा महापौर होणाची शक्यता वाढली होती. सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याने फुटीर नगरसेवक परतल्याचा फुटीर नगरसेवकांचा दावा आहे. भाजपचे सतीश कुलकर्णी यांची नाशिकच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली. संख्याबळ जुळत नसल्याने शिवसेनेच्या उमेदवाराकडून निवडणुकीतून माघार घेण्यात आली. कुलकर्णी यांच्या विरोधात भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले. त्यामुळे नाशिक महाशिवआघाडीत फूट पडल्याची चर्चा होती. आपल्या उर्वरित नगरसेवकांना सहलीला पाठवण्याची नामुष्की भाजपवर आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सेनेचा-भाजपशी असलेला संसार मोडून सेनेने आघाडीच्या पक्षांशी मिळवलेला सूर राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेंमध्ये देखील अडचणीचा ठरला होता. पण भाजप महापौरपदी कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

अकोल्यात भाजपच्या अर्चना मसने महापौरपदी 

अकोला महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदावर भाजपने बाजी मारली. अकोल्याच्या महापौर पदी भाजपाच्या अर्चना मसने यांची निवड झालीय. त्यांनी काँग्रेसच्या अजरा नसरीन यांचा 48 विरूद्ध 13 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचेच राजेंद्र गिरी यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसच्या पराग कांबळे यांचा 48 विरूद्ध 13 मतांनी पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीत तब्बल शिवसेना आठ आणि एमआयएमचा एक नगरसेवक असे नऊ नगरसेवक तटस्थ राहिले. तर तब्बल 10 नगरसेवक मतदानाला अनुपस्थित राहिले. यामध्ये राष्ट्रवादीचे पाच, वंचितचे तीन, भाजपच्या माजी महापौर सुमन गावंडे आणि एक अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. अकोला महापालिकेत भाजपचे 80 पैकी 48 नगरसेवक आहे. त्यामूळे महापौर-उपमहापौर पदावर भाजप उमेदवारांची निवड निश्चित मानली जात होती. महापालिकेत एकूण ८० नगरसेवकांपैकी भाजपचे ४८ नगरसेवक आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसचे १३ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, भारिप-बमसंचे ३, एमआयएम-१ आणि दोन अपक्ष नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ८ नगरसेवक आहेत. 

नागपूर महापालिकेच्या महापौरपदी संदीप जोशी यांची निवड 

नागपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या संदीप जोशी यांची निवड झाली आहे. भाजपच्या संदीप जोशी यांना 104 मतं तर काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना 26 व बसपाच्या मोहम्मद इब्राहिम यांना 10 मते मिळाली आहेत. त्यामुळे महापौर पदाची ही निवडणूक एकतर्फी झाली आहे. नागपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे संदीप जोशी यांचा ७८ मतांनी विजय, संदीप जोशी यांना मिळाली १०४ मते, काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना २६ मते मिळाली आहेत. 151 नगरसेवक असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपचे तब्बल 108 नगरसेवक निवडणून आले होते. यापैकी एका नगरसेवकाच पद रद्द करण्यात आले आहे, एक नगरसेवक पक्षातून निलंबित करण्यात आला आहे, एका नगरसेवकाच निधन झाले आहे तर एक नगरसेवक रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे भाजपच्या सर्व 104 नगरसेवकांनी संदीप जोशी यांना महापौर पदासाठी मतदान केले. गरीब व गरजू रुग्णांसाठी 'महापौर मदत निधी' सुरू करण्याची घोषणा जोशी यांनी केली. यासोबतच नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी "वॉक अँड टाक विथ मेयर" हा कार्यक्रम देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

परभणीत काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर तर कॉंग्रेस चे भगवान वाघमारे उपमहापौरपदी 

परभणीत आज महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही लढत भाजपच्या मंगल मुदगलकर विरुद्ध काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे यांच्यात झाली. परंतु, निवडणूकीत भाजप एकाकी पडल्याचे दिसून आले. भाजपच्या मंगला मुदगलकर यांना केवळ 8 मते पडली. दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार बुहुमतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर तर कॉंग्रेस चे भगवान वाघमारे उपमहापौरपदी विराजमान झाले. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एका गटासह १४ नगरसवेक तटस्थ राहिलेत. सहा सदस्य हे अनुपस्थित राहिलेत. तर उपमहापौर पद निवडणुकीत काँग्रेसचे भगवानराव वाघमारे विजयी झाले असून त्यांना ३७ मते पडलीत. तर भाजपचे मोकिंद खिल्लारे हे पराभूत झालेत. त्यांना आठ मते मिळालीत. याही निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य आणि राष्ट्रवादीचे १० असे एकूण १५  तटस्थ राहिले. तर ५ नगरसेवक गैरहजर राहिलेत. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी झाली. 65 सदस्यीय परभणी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे 30 सदस्य असून, त्या खालोखाल राष्ट्रवादीचे 19, भाजप 8, शिवसेना 5, एमआयएम 1 आणि इतर 2 सदस्य आहेत. महापौरपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. परंतु पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या डॉ. वर्षा संजय खिल्लारे, गवळणबाई रोडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीत रिंगणात काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे व भाजपाच्या मंगला मुदगलकर यांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणुक घेण्यात आली. 65 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत सर्वाधिक काँग्रेसकडे 31 एवढे संख्याबळ आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 20, भाजपा 8, सेना 5, एमआयएम 1 व अपक्ष 1 असे संख्याबळ आहे. स्विकृत सदस्य निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे दोन गट पडले असून एका गटाकडे 13 सदस्य तर दुसर्‍या गटाकडे 7 सदस्य आहेत. महापालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला 3 सदस्यांची आवश्यकता होती. त्यामुळे काँग्रेसने बाबाजानी दुर्राणी यांच्या गटाच्या 7 सदस्यांना विश्‍वासात घेतल्याने काँग्रेसचे पारडे जड राहिले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी सूरमंजिरी लाटकर


कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४९ व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर यांची तर ४५ व्या उपमहापौरपदी संजय वसंतराव मोहिते यांची निवड झाली. अॅड. लाटकर यांनी भाजपच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांचा तर मोहिते यांनी ताराराणी आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांचा ४३ विरुद्ध ३२ असा पराभव केला. महापौर माधवी गवंडी व उपमहापौर भूपाल शेटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात निवड सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी दौलत देसाई होते. विषयपत्रिकेचे वाचन नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी केले. महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या अॅड. लाटकर व भाजपच्या शेटके यांचे अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर करत माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी पीठासन अधिकाऱ्यांनी दिला. दोन्ही अर्ज कायम राहिल्याने हात वर करुन निवड करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रथम लाटकर यांच्यासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यांना ४३ मते मिळाली. तर शेटके यांना ३२ मते मिळाली. लाटकर यांना ११ मतांनी विजयी घोषीत करण्यात आले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे मोहिते व ताराराणी आघाडीचे भोपळे यांच्यामध्ये लढत झाली. अपक्षेप्रमाणे मोहिते यांनी ४३ मते मिळवत भोपळे यांचा ११ मतांनी पराभव केला. देसाई यांनी मोहिते यांना विजयी घोषीत केले. सत्ताधारी काँग्रेसचे 30, राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 4 नगरसेवकही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे सत्ताधारयांचे संख्याबळ 47 झाले आहे. विरोधी भाजपचे 14 व ताराराणी आघाडीचे 19 नगरसेवक असल्याने त्यांची संख्या 33 आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.