Thursday 28 February 2019

EVM vvpat कोणीही मतदार वंचित राहू नये, हे लोकसभा निवडणुकांसाठी आयोगाचे बोधवाक्य! पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत जनजागृती

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने
पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत जनजागृती 


पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत जनजागृती करताना 

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत निवडणूक आयोगाच्या जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला. पुणे शहरातील सर्व मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. कसबा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी सर्वाधिक प्रतिसाद दर्शवला. आपण केलेल्या मतदानाची पोहोच पावती देणाऱ्या व्ही व्ही पॅट यंत्रणेचं प्रात्यक्षिक सामान्य मतदार, युवक, वृद्ध नागरिकांना दाखवण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्ही व्ही पॅट यंत्रणेबद्दल सर्व मतदार संघात जनजागृती केली जात असून त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच या प्रात्यक्षिकाचंचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा  मतदार संघात गेली काही दिवसांपासून अशा प्रकारे या यंत्रणेचे प्रात्यक्षिक सादर केले जात असून मतदारांमध्ये त्याविषयी असणाऱ्या सर्व शंकांचं निरसन देखील केले जात असल्याचे पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी म्हंटले आहे.  
================================================

मतदार  जागृती व शिक्षण कार्यक्रम (स्‍वीप)

भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगयांच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदार वर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकानेभारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्‍यासाठी मतदार जागृती व शिक्षण कार्यक्रम फार महत्‍त्वाचा घटक ठरला आहे. मतदान प्रक्रियेत मुख्यत्वे दोन महत्त्वाचे घटक- १)  मतदान केंद्राची सुसज्ज व्यवस्था व सुलभ मतदान करण्याची व्यवस्था तयार करणे 
२) मतदारांना जागृत करून मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदान करण्यास आवाहन करणे आणि त्यासाठी नावीन्‍यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे. आजपर्यंत जाणीव – जागृती कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थाद्वारे मुख्यत्वे पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, शपथ समारोह, प्रभात फेरी इत्यादी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात आहे. परंतु सध्‍याच्‍या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी स्वीपमध्ये विशेषता नावीन्यपूर्ण कल्पना संकल्पना आणि मतदान मतदार जागृतीची शासन यंत्रणा उभी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नवीन संकल्पना सांगितल्या आहेत.
भारत निवडणूक आयोग नवीन संकल्पना-
१) चुनाव पाठशाळा
2) महाविद्यालय स्तरावर मतदार जागृती मंडळाची स्थापना,  प्रशिक्षण  कामे व जबाबदारी 
३) माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर भविष्यातील मतदारांसाठी मतदान मतदार जागृती मंडळाची स्थापना व प्रशिक्षण
४) मतदार जागृती मंचाची स्थापना
 सर्व शासकीय राज्य शासकीय आणि केंद्र शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, सहकारी संस्था कार्यालय, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांची कार्यालये, कारखाने, सर्व खासगी व्यवस्थापनाची कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांची कार्यालय याठिकाणी मतदार जागृती मंचाची स्थापना करून जाणीव जागृती उपक्रम, चर्चासत्र, स्पर्धा, दृकश्राव्य साधनांद्वारे जागृती आणि सर्व कर्मचाऱ्यांची मतदान नोंदणी करणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे. 
५) दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन- या लोकसभा निवडणुकांचे ब्रीदवाक्यच ‘सुलभ निवडणुका’  हे आहे. यात कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये.  दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्‍टया दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून त्यांच्यासाठी मतदार नोंदणी करण्यास मदत करणे. त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी - येण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्‍ती करणे  इत्यादी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिव्यांग जनजागृती कार्यक्रमांमध्ये निश्‍चीत करण्‍यात आल्‍या आहेत.
६) महाविद्यालयातील कॅम्पस अँम्बेसिडरचा मतदार जनजागृतीमध्ये  सहभाग- महाविद्यालय स्तरावर सहभाग वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर तरुणांना प्रोत्साहित करून स्थानिक समुदायांमध्ये जसे ग्रामस्थ,  वस्ती- वाड्यांवर जागृतीच्या मोहिमांमध्‍ये महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचा सहभाग वाढवणे. 
मतदार जाणीव जागृती व शिक्षण यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी काय उपक्रमराबवू शकतात-
 १) सर्व गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, पतसंस्था सहकारी संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन मतदारांसाठी शपथ समारंभाचे आयोजन, पथनाट्य, चर्चासत्र, दृक-श्राव्य साधनांद्वारे भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या चित्रफिती, क्लिप्स, व्हिडीओ क्लिप्स, संदेश, चित्रसंदेश मतदारापर्यंत पोहोचविणे, स्पर्धांचे आयोजन करणे,विशेषत: महिला मतदार आणि युवक - युवती मतदारांचे  मेळावे, चर्चासत्र आयोजित करणे, सोशल मीडियाचा उपयोग करून आदर्श आचारसंहितेचे पालन करत मतदारापर्यंत मतदान जागृती संदेश पोहोचवणे.
२) शाळा आणि महाविद्यालय, माध्यमिक कनिष्ठ, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय इत्यादी स्तरावर स्थापन झालेला मतदार जागृती क्‍लबने  पथनाट्य बसवून महाविद्यालयात आणि महाविद्यालयाबाहेरील समुदायामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये वाड्या - वस्त्यांमध्ये त्या कार्यक्रमाचे आयोजन करणे.
 ३) ग्रामस्तरावर चुनाव पाठशाळा – ग्रामस्‍तरावर  चुनाव पाठशाळा सदस्यांना सक्रिय करून त्यांना मतदार जागृती प्रशिक्षण देणे आणि संबंधित मतदान केंद्र अधिकारी म्हणजे बीएलओ  यांच्याशी संपर्क करून ग्रामीण जनतेला जागृत करण्याचे कार्य विविध उपक्रमांद्वारे करणे.
 ४) खाजगी संस्था, कंपन्या यांच्या मदतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांची जागृती होण्यास सहाय्य करणे.
मतदार जागृती मध्ये लक्षात घ्यावयाच्या विशेष बाबी-
 १) आपल्या मतदान केंद्रावरील बीएलओ  त्यांच्याशी सतत संपर्कात राहून त्यांना मतदार जागृती कार्यक्रम व मतदान नोंदणी अभियानात सक्रिय मदत करणे.
२) मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून मतदार नोंदणीची, मतदान करण्यासाठीची  जागृती केली पाहिजे, असे पोस्टर, बॅनर, होर्डिंग याशिवायसोशल मीडिया म्हणजेच समाजमाध्यमे, रेडिओ,  कम्युनिटी, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारे मतदार जागृतीचे संदेश पोहोचविणे.
३) मतदार ओळखपत्र - प्रत्येक मतदारांना मतदार ओळखपत्र  बीएलओ द्वारा घेण्यासाठी मदत करणे आणि सहाय्य करणे. ४) मतदार सहायक केंद्राद्वारे मतदारांना आपले नाव तपासून पाहण्याची सोय उपलब्ध करून देणे, राज्‍याच्‍या मुख्य निवडणूक अधिकारीयांच्या पोर्टलवरून मतदारांचे नाव यादीत आहे की नाही याविषयी त्यांना माहिती करून देणे. ५) नैतिक मतदानाची माहिती - मतदारांना नैतिक मतदानाची माहिती व जागृती करून देणे, भारतीय लोकशाहीत नागरिकांचे कर्तव्य आणि मतदानाची पावित्र्य राखण्यासाठी विविध माध्यमांद्वारे नैतिक मतदानाचे महत्‍त्वपटवून देणे, विशेषत:  चर्चासत्रे, वक्‍तृत्‍वस्‍पर्धा, रॅली, मानवी साखळी व शपथपत्र इत्यादी माध्‍यमांचा  नैतिक मतदानासाठीचा उपयोग करता येतो.
६) मतदान केंद्राची माहिती सामान्य जनतेला पोहोचणे, मतदान केंद्रासंबंधी सहाय्य करणे.
 ७) आदर्श मतदान केंद्र उभारण्‍यासाठी विशेष मदत व सहाय्य करणे - लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतदान प्रक्रिया लोकशाही उत्सव म्हणून साजरा करणे आणि प्रत्येक मतदारांना मतदान करण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य करणे, 
आदर्श मतदान केंद्रासाठी नावीन्‍यपूर्णखालील बाबींचा उपयोग करता येईल. १) पहिल्या शंभर मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्‍वागत करणे २) मतदान केंद्रावर रांगोळी काढणे आणि मतदान केंद्र सुशोभित करणे ३) मतदान केंद्रावर सनई चौघडे वाजविणे ४) दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर आहे की नाही याची चौकशी करून ते उपलब्ध करून देणे ५) ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे  इत्यादी नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या परिसरातील मतदान केंद्र आदर्श करण्याचा प्रयत्न करणे, जसे आपण समारंभासाठी जय्यत तयारी करतो तसे मतदान केंद्र साठी आणि मतदानासाठी तयारी करणे. ८) इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन (इव्हीएम) व्‍होटर व्‍हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल (व्‍हीव्‍हीपॅट) बाबत जागृती - व्‍हीव्‍हीपॅट ही नवीन प्रणाली असून मतदारांना डेमो देऊन तज्ञ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून व्‍हीव्‍हीपॅट जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे. या प्रणालीमुळे आपण मतदान कोणाला केले हे दिसते आणि पारदर्शकता निर्माण होते. पुणे जिल्‍ह्यात जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वीपचे सुभाष बोरकर,आशाराणी पाटील, यशवंत मानखेडकर हे विविध स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या सहकार्याने मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवत आहेत.
=================================================

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

सोशल मीडियावरील पोस्टबाजी यांवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून निवडणूक काळात होणाऱ्या पेड न्यूज ,आर्थिक व्यवहारांवर आणि सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. तसेच मोबाईल नेटवर्क पोहचत नाही, अशा ६९ ठिकाणांशी सुसंवाद ठेवण्यासाठी सॅटेलाईट फोन खरेदी केले जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील, पुणे, मावळ, बारामती व शिरूर लोकसभा मतदार संघाची सविस्तर माहिती दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी होते. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे सप्टेबर २०१८ पासून जानेवारी २०१९ पर्यंत अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेतली. अजूनही मतदारांची नोंदणी करण्याचे काम सुरू असून निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतरही मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना कोणत्या सुविधा हव्या आहेत,याबाबतची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाला मोबाईल अँपद्वारे कळवता येणार आहे.त्यानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी आदी तालुक्यात काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क किवा वायरलेस यंत्रणा काम करत नाही. जिल्ह्यात अशी ६९ ठिकाणे आहेत. निवडणूक काळात या ठिकाणांशी संपर्क ठेवता यावा, या उद्देशाने सॅटेलाईट फोन खरेदी केले जात आहेत.त्यासाठीचा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून घेण्यात आला आहे. तसेच मागील निवडणूकांचा अनुभव विचारात घेवून जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर योग्य पोलीस बंदोबस्त व इतर यंत्रणा उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे १ कोटी ४ लाख असू शकते. या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्यात सध्या ७३ लाख ६३ हजार ८१२ मतदारांची नोंदणी झालेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदारांची संख्या ६३ लाख ४८ हजार ७०४ एवढी होती. यंदा १८ ते १९ वर्षे वय असलेल्या मतदारांची संख्या ५४ हजार ११५ आहे. निवडणूक प्रक्रियेत काम करणा-या कर्मचा-यांना मतदान करता यावे,यासाठी सुमारे ५५ हजार कर्मचा-यांची पोस्टल पध्दतीने मतदान करून घेतले जाणार आहे. पुरूष मतदारांच्या गुणोत्तर प्रमाणात महिला मतदारांच्या संख्या वाढली आहे असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक- आकडेवारी
एकूण मतदार  ७३,६३,८१२ (२०१९) , ६३,४८,७०४ (२०१४)
पुरूष मतदार ३८,५१,४४५ (२०१९), ३३,५३,६८८ (२०१४)
महिला मतदार ३५,१२,२२८  (२०१९), २९, ९५, ००४ (२०१४)
ट्रान्सजेंडर -१३९ (२०१९), १ (२०१४)
नवमतदार- ५४,११५ (२०१९),६९,२६१ (२०१४)
दिव्यांग मतदार- १३,७४९  
यादीतून वगळलेले मतदार -५९,९२२
================================================

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न--विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवारी दि. 2 आणि रविवारी दि. 3 मार्च रोजी पुणे विभागात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत पुनर्निरिक्षण कार्यक्रमात वंचित राहिलेल्या नागरिकांना नावनोंदणी करून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पुणे विभागातील कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याच माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुक 2019 च्या तयारीचा आढावा आणि विशेष मतदार नोंदणी मोहिम या बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उप आयुक्त (महसूल) प्रताप जाधव उपस्थित होते.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकानुसार ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. दि. 23 व दि. 24 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या विशेष मोहिमेद्वारे नावनोंदणी करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या विशेष मोहिमेमुळे ज्यांना नव्याने मतदार नोंदणी करायची आहे, ज्यांचे मतदार यादीतून नाव वगळले गेले आहे, अथवा मतदार नोंदणी अभियानात ज्यांनी नावनोंदणी केलेली नाही, अशा नागरिकांना मतदार नोंदणीची ही शेवटची संधी आहे. या मोहिमेत नोंदणी करणाऱ्या मतदारांची नावे आगामी निवडणुकपूर्व यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. 
अशी करा नोंदणी 
- प्रत्येक मतदार केंद्रावर मतदार नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन. 
- या केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील. 
- 'बीएलओ'कडे अर्ज क्रमांक '६', '७', '८' व '८ अ' हे अर्ज उपलब्ध असतील. 
- मतदारांना हे अर्ज भरून 'बीएलओ'कडे देता येईल. 
- नोंदणी झाल्यावर मतदारांची नावे निवडणूकपूर्व मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. 
नव मतदारांच्या नोंदणीवर विशेष भर
- ज्या युवक-युवतीचे वय 18 ते 19 वर्षे आहे त्यांच्या नाव नोंदणीवर विशेष भर
-कोल्हापूर, पुणे, सोलापूरच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंशी नोंदणी बाबत चर्चा.
-शिकण्यासाठी शहरात आलेल्या नवमतदारांची नोंदणी त्यांच्या गावी करण्याची व्यवस्था.
- नवमतदारांची नोंदणीवर विशेष भर-
 गो-व्हेरीफाय मोहिम- मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांजवळ १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी उपलब्ध असेल. या यादीत मतदारांना आपल्या नावाची पडताळणी करता येणार आहे. मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठीच असून, मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी. 
मतदार यांद्याचे चावडी वाचन- 
ग्रामीण भागातील निरक्षर मतदारांसाठी मतदार याद्यांचे त्यांच्या गावातील चावडीवर वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे निरक्षर व्यक्तीलाही आपल्या नावाची खात्री मतदार यादीत करता येवू शकते.
 दिव्यांगांसाठी विशेष सोयी-
मतदान प्रक्रीयेत दिव्यांग व्यक्ती राहू नये, मतदान करताना त्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सोयी-सवलती देण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तीसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मतदार संघातील मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. 
महिलांचा टक्का वाढला-
पुणे विभागात नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिलांच्या नावांच्या नोंदीची संख्या वाढली आहे. या मुळे मतदार यादीत महिलांचा टक्का वाढला आहे. युवकांबरोबर महिलांच्या नावनोंदणीला ही विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. नवविवाहीत महिलांच्या नावांची नोंदणीही करण्यात येत आहे. नवविवाहितांना नोंदणीसाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. 
येथे करा ऑनलाइन नावनोंदणी
- मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या वेबसाइटवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा. 
-www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अधिक माहिती घेता येईल. 
- नोंदणीविषयी अधिक माहितीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध.
================================================

सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल- जिल्‍हाधिकारी राम


आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या दृष्टिने सर्व समन्वय अधिका-यांनी ( नोडल ऑफीसर्स) योग्‍य ती पूर्वतयारी केल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी समाधान व्‍यक्‍त केले असून सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडली जाईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, बारामती लोकसभा मतदार संघाचे सुभाष डुंबरे, शिरुर लोकसभा मतदार संघाचे रमेश काळे,उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.जिल्‍हाधिकारी श्री. राम यांनी प्रारंभी समन्‍वय अधिका-यांकडून त्‍यांच्‍यावर सोपवण्‍यात आलेल्‍या जबाबदारीची आणि त्‍यांनी केलेल्‍या पूर्वतयारीची माहिती  घेतली. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्‍त्‍वाची असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी (स्‍वीप कार्यक्रम) विविध सामाजिक व स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेण्‍यात येणार असून पथनाट्ये, पोस्‍टर्स, वैयक्तिक भेटी, कलापथक अशा विविध साधनांचा वापर केला जाणार आहे. वृत्‍तपत्रे,  रेडिओ,दूरचित्रवाणी, तसेच सोशल मिडीयाद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.बैठकीत मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा,( रॅम्‍प, वीज, पाणी, प्रसाधनगृहे),  दिव्‍यांग मतदार याबाबत माहिती घेण्‍यात आली.
=======================================

‘कोणीही मतदार वंचित राहू नये’ हे लोकसभा निवडणुकांसाठी आयोगाचे बोधवाक्य!


लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘कोणीही मतदार वंचित राहू नये’ हे बोधवाक्य (मोटो) ठरविले असून असून मतदार आपले मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. टपाली मतदान पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेता आयोगाने सर्व्हीस वोटर्ससाठी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान चिठ्ठीचा एका बाजूचा प्रवास वाचणार असून मतदानानंतर स्पीड पोस्टने तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे टपाली मतदान पाठविता येणार आहे.

मुक्त, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यास वचनबद्ध - निवडणूक आयुक्त अशोक लवासा



आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, शांततापूर्ण, निर्भय वातावरणात आणि पारदर्शक तसेच सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांनी पत्रकार परिषदेत दिली.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार, भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण, महासंचालक (व्यय) दिलीप शर्मा यावेळी उपस्थित होते.यावेळी श्री. लवासा यांनी माहिती दिली, कालपासून दोन दिवस आयोगाने राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. सर्व राष्ट्रीय पक्ष, तसेच राज्यातील मान्यताप्राप्त पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठका घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी आणि पोलीस नोडल अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. निवडणुकीतील पैशाचा गैरवापराला आळा घालण्याच्या दृष्टीने आयकर विभाग, पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), परिवहन विभाग, भारतीय पोस्ट आदी विभागांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. आज राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. याशिवाय राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा निवडणूक प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला.श्री. लवासा म्हणाले, मतदार याद्यांची काटेकोर तपासणी करुन त्या अचूक असतील याची काळजी घेण्यास निवडणूक आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्या अचूक असल्याबाबत खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही राजकीय पक्षांनी निवडणूक याद्यांविषयी प्रश्न उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दुबार मतदार शोधण्यासाठी आयोगाचे स्वत:चे सॉफ्टवेअर असून कोणत्याही एका व्यक्तीची एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असल्यास संबंधिताच्या संमतीने एका ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणची नावे वगळण्यात येतील.यावेळच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर आणि प्रत्येक ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट यंत्रांचा शंभर टक्के वापर होणार आहे. त्यामुळे मतदार केलेल्या मतदानाची खात्री करु शकेल. याशिवाय व्हीव्हीपॅट यंत्रांमधील चिठ्ठयांच्या मोजणीसाठी त्या मतदार संघांतील कोणताही उमेदवार अर्ज करु शकेल. राज्यभरात व्हीव्हीपॅट जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 92 हजार 428 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट जागृती मोहीम राबविण्यात आली असून 37 लाखांहून अधिक प्रतिरुप मतदान नोंदविण्यात आले आहे. अनिवासी भारतीयांना कोणत्याही पद्धतीची ऑनलाईन मतदानाची सोय नसून याबाबत चुकीची माहिती व्हॉट्सॲपवर प्रसारित करणारी पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिवासी भारतीय नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊनच मतदान करायचे आहे. निवडणुकीतील सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता मीडिया मॉनिटरिंग ॲण्ड मीडिया सर्टिफिकेशन (एमसीएमसी) समितीमध्ये सोशल मीडिया तज्ज्ञाचा समावेश करण्याबाबत कालच आयोगाने सुधारित सूचना जारी केल्या आहेत. या समितीकडून सर्व पेड न्यूज प्रकरणांची  तपासणीही केली जाईल. आयोगाने ‘कोणीही मतदार वंचित राहू नये’ हे या निवडणुकीसाठीचे बोधवाक्य (मोटो) ठरविले असून मतदार आपले मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. टपाली मतदान पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेता आयोगाने सर्व्हीस वोटर्ससाठी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान चिठ्ठीचा एका बाजूचा प्रवास वाचणार असून मतदानानंतर स्पीड पोस्टने तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे टपाली मतदान पाठविता येणार आहे.कोणत्याही नागरिकाला निवडणूक कालावधीत कोठे गैरप्रकार आढळून आल्यास तेथील छायाचित्र, व्हिडिओ चित्रफित मोबाईलवर अपलोड करण्यासाठी cVigil ॲप  तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गैरप्रकारांना निश्चितच आळा बसणार आहे. या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांना निवडणुकीच्या अनुषंगाने विविध परवानग्यांसाठी SUVIDHA मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून सर्व परवानग्या एक खिडकी पद्धतीने दिल्या जातील. दिव्यांग मतदारांवर यावर्षी विशेष लक्ष देण्यात येत असून PwD वापर करुन दिव्यांग व्यक्ती मतदार नोंदणी, नाव, पत्ता आदी दुरुस्ती तसेच मतदान केंद्रावर व्हीलचेअर आदी सुविधांसाठी नोंदणी करु शकतील. 1950 या मतदार हेल्पलाईनचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून मतदार यादीतील नाव तपासणे तसेच अन्य मदतीसाठी या हेल्पलाईनचा वापर करता येणार आहे.

लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील – निवडणूक आयोग


भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील असे निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. सर्व राजकीय पक्षांबरोबर चर्चा केली आहे. ईव्हीएम मशीनला लोकांनी फुटबॉल बनवल्याची खंत निवडणूक आयोगाने व्यक्त केली. लखनऊमध्ये दोन दिवस निवडणूक आयोगाची बैठक झाली. सध्या भारत-पाकिस्तामध्ये तणाव आहे. युद्धाची स्थिती असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत होती. पण निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूका ठरलेल्या वेळीच होतील हे स्पष्ट केले. एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.