Thursday 27 December 2018

जयकुमार रावल आता रामटेकवर ; ‘रामटेक’ बंगला व वादग्रस्त नेत्यांची परंपरा

जयकुमार रावल आता रामटेकवर ; ‘रामटेक’ बंगला व वादग्रस्त नेत्यांची परंपरा


वादग्रस्त नेत्यांची परंपरा असलेल्या ‘रामटेक’ बंगला पुढील ३ महिन्यांसाठी राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना देण्याचा शासन निर्णय आज दि. २७ डिसेंबर २०१८ रोजी काढण्यात आला आहे. 'रामटेक' बंगल्याचा वादळी आणि थरारक इतिहास असल्यामुळे कोणीही घेण्यास धजावत नव्हते. अखेर रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी धाडस दाखवले आहे.  पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीमार्फत पर्यटन विभागाचे रिसॉर्ट लाटल्याचा आरोप आहे मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रीमंडळातील रावल यांच्यासह चार मंत्र्यांवर झालेले आरोप फेटाळून लावत त्यांना क्लीनचीट दिली होती. भोसरी येथील एमआरडीसी जमीनखरेदी प्रकरणात मं‌‌त्रिपद गमावावे लागलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मलबार हिल येथील ‘रामटेक’ हा सरकारी बंगला सोडला होता. मं‌त्रिपद गेल्यानंतर ते सरकारी दराने भाडे भरून हा बंगला वापरत होते. एकनाथ खडसे यांनी शासकीय निवासस्थान रामटेक बंगला वास्तव्यापोटी थकित भाडे 15,49,974 रुपये इतकी रक्कम भरली नव्हती. शासकीय बंगला मंत्री पदावर असेपर्यंत देण्यात आला होता. खडसे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिनांक 4 जून 2016 रोजी दिला आणि बंगला दिनांक 19 नोव्हेंबर 2016 रोजी रिक्त करत शासनाच्या ताब्यात दिला. भाडे माफ करण्याची विनंती केल्यानंतर 26 मार्च 2018 रोजी खडसे यांची विनंती विशेष बाब म्हणून शासनाने मान्य केली होती. तर आघाडी सरकारच्या काळातील मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी 3330 चौरस फुटाची 'सुरुची' सदनिका रिक्त केली नाही. गावित यांनी 20 मार्च 2014 रोजी मंत्री पदांचा राजीनामा दिला आणि दिनांक 29 जुलै 2016 रोजी सदनिका रिक्त केली. त्यांच्यावर 43 लाख 84 हजार 500 इतकी रक्कम गावित यांनी भरली नाही. भाडे माफ करण्याची विनंती दिनांक 29 जुलै 2018 रोजी केल्यानंतर 22 ऑक्टोबर 2018 रोजी गावित यांचे विनंती विशेष बाब म्हणून शासनाने मान्य केली होती. 

 ‘रामटेक’ बंगला व वादग्रस्त नेत्यांची परंपरा

1975 च्या आणीबाणीनंतर ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई गंभीर आजारी होते. या काळात त्यांचं वास्तव्य शरद पवारांच्या याच रामटेक बंगल्यात होतं. दलवाईंनी मृत्यूनंतर आपलं दफन नव्हे तर दहन करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली. पण इस्लाममध्ये पार्थिवाचं दहन करण्यास मनाई आहे. त्यामुळे शरद पवारांना हमीद दलवाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या वादाचा सामना करावा लागला. त्या काळातही पवारांचं वास्तव्य रामटेकमध्येच होते.1978 साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदची स्थापना केली. दादांचं सरकार पाडणार नाही, म्हणता म्हणता पवारांनी याच रामटेक बंगल्यातून सरकारला धक्क्याला लावलं आणि त्यावेळीही रामटेक बंगला चर्चेत होता. त्यामुळेच रामटेक बंगला लाभतो, अशी धारणा तयार झाली. 1995 साली युतीचं सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला हट्टाने मागून घेतला. पण मुंडेंना बंगला किती लाभला हा संशोधनाचा विषय आहे. कारण याच काळात मुंडेंचे एका नर्तिकेशी जवळचे संबंध असल्याचा आरोप झाला. ज्यावरुन आख्ख्या राज्यात राळ उडाली आणि मुख्यमंत्री असलेल्या जोशी सरांसोबतचं शीतयुद्ध मुंडेंना चार वर्ष पुरले. रामटेक लाभतो म्हणता म्हणता 1999 ला मुंडेंना सत्ता सोडावी लागली. आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ रामटेक बंगल्यात आले उपमुख्यमंत्री म्हणून. पण तेलगी प्रकरणाने डोकं वर काढले आणि भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. अर्थात त्यातून भुजबळ सहीसलामत सुटले खरे, पण तोवर त्यांना बराच त्रास सहन करावा लागला होता. सत्ता गेल्यानंतर भुजबळांची जागा एकनाथ खडसेंनी घेतली. मुख्यमंत्र्यांनंतर खडसेच सरकारमधील वजनदार मंत्री होते. पण दीड वर्षातच खडसेंच्या मागेही भ्रष्टाचाराच्या आरोपांचं भूत लागले. खडसेंनी यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण रामटेक खडसेंचे मंत्रिपद खाऊनच शांत झाला. खडसें यांनी रामटेकवर वास्तूशास्त्राची पूजाही घातली होती, पण त्याचा फायदा काही झाला नव्हता. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0=========

पुस्तक घर पोहोच मिळावा* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 

HTTPS://IMOJO.IN/PRABINDIA

=============0===========0=========


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.